तंत्रज्ञानातील दिग्गज कंपनी अॅपलने भारतात तरुणांसाठी बंपर भरती काढली आहे. तेलंगणाची राजधानी हैदराबादमधील अॅपलच्या कार्यालयात देशातील प्रतिभावंत तरुणांना नोकरी मिळण्याची संधी आहे. कंपनीने येथील आपल्या कार्यालयात नुकतीच ३ हजार ५०० जणांची नियुक्ती केली असून ही संख्या ५ हजारापर्यंत नेण्याचा कंपनीचा विचार आहे.

तेलंगणा सरकारमधील एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने याबाबत माहिती दिली. अॅपलने तेलंगणामधील कार्यालयात ३ हजार ५०० जणांची नियुक्ती केली आहे, लवकरच ही संख्या ५ हजार करण्याचा कंपनीचा विचार आहे, त्यामुळे अजून दीडहजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती येथे होईल, असं या अधिकाऱ्याने सांगितलं. पण, ही भरती केव्हापर्यंत होणार याबाबत कंपनीकडून अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

गेल्या वर्षी मे महिन्यात अॅपल कंपनीने तेलंगणामध्ये विकास केंद्राची स्थापना केली होती. त्यावेळी या विकास केंद्रामुळे ४ हजार जणांना रोजगार मिळू शकतो, असं कंपनीकडून सांगण्यात आलं होतं. या केंद्रामध्ये कंपनीकडून आयफोन, आयपॅड, मॅक आणि अॅपल वॉच या उत्पादनांवर काम केलं जातं.