आंध्र प्रदेशचे विभाजन करून तेलंगणा या वेगळ्या राज्याच्या निर्मितीच्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या निर्णयाविरोधात तेलगू देसम पक्षाचे प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांनी सोमवारी राजधानीत बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. वेगळ्या तेलंगणावरून कॉंग्रेस राजकारण करीत असल्याचा आरोप नायडू यांनी केला. 
ते म्हणाले, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेलंगणा राष्ट्र समिती आणि वायएसआर कॉंग्रेस यांना चुकारण्याचा प्रयत्न कॉंग्रेस पक्ष करतोय. वेगळ्या तेलंगणाच्या निर्मितीचा निर्णय घेऊन कॉंग्रेस पक्षाने आंध्र प्रदेशवर संकट ओढवून ठेवले असून, कॉंग्रेसच्या या निर्णयामुळे देशाचे नुकसान होणार असल्याचाही आरोप त्यांनी केला.
वारसाहक्कांची पोरखेळी लढाई
तीन ऑक्टोबर रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने वेगळ्या तेलंगणा राज्यनिर्मितीला हिरवा कंदील दाखविला. हैदराबाद ही दहा वर्षांसाठी संयुक्त राजधानी ठेवून तेलंगणा राज्याची निर्मिती करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला. या निर्णयानंतर तेलंगणविरोधी आंदोलनाने सीमांध्र प्रदेशात हिंसाचाराचा आगडोंब उसळला असून संचारबंदीचा आदेश धुडकावून शेकडो आंदोलक रस्त्यांवर उतरल्याने दिसता क्षणी गोळी घालण्याचे आदेश विजयनगर शहर व जिल्ह्य़ातील इतर भागांत देण्यात आले आहेत. हिंसक घटनांमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षकांसह १२ पोलीस जखमी झाले असून पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमकी झडत आहेत.