आंध्र प्रदेशाचे विभाजन करून तेलंगणा राज्याच्या निर्मितीचे तेलंगणावासीयांचे स्वप्न लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. स्वतंत्र तेलंगणा राज्याच्या निर्मितीबाबत केंद्र सरकारने सकारात्मक भूमिका घेतली असल्याचा दावा तेलंगणा विभागातील दोन मंत्र्यांनी सोमवारी केला. या प्रश्नावर तोडगा शोधण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी दिलेल्या मुदतीस दोन आठवडय़ांचा कालावधी उरला असताना या नेत्यांनी केलेल्या दाव्यामुळे स्वतंत्र तेलंगणाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. आंध्र प्रदेशचे विभाजन होणार असून हैदराबाद हीच आगामी १० वर्षांसाठी दोन्ही राज्यांची राजधानी असेल, असे संकेत केंद्र सरकारने आपल्याला दिले असल्याचे आंध्र प्रदेशचे कामगारमंत्री डी. नागेंद्र यांनी सांगितले.