तेलंगणामधील प्राथमिक शाळेतील शिक्षिका संध्या यांचे करोनामुळे १७ एप्रिल निधन झाले. त्यांनी निवडणूक केंद्रावर ड्युटी केली होती. त्यानंतर त्यांना करोनाची लागण झाली. नागार्जुनसागर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शिक्षकांना निवडणूक ड्युटीवर बोलावण्यात आले होते. त्यांना ८ वर्षांची मुलगी आहे. राजकारण आणि निवडणुकांमुळे जीवन उध्वस्त झाले, असा आरोप संध्या यांचे पती कम्ममपति मोहन राव यांनी  केला आहे. यामुळे आतापर्यत १५ जणांचा मृत्यू झाला आहे. तेलंगणा उच्च न्यायालयाने स्वत: या प्रकरणाची दखल घेतली आहे. राज्याचा हा “अपराध, निष्काळजीपणा” आहे. ज्यामुळे निवडणुकीच्या वेळी १५ शिक्षकांचा मृत्यू झाला. तर शेकडोजण कोविड पॉझिटिव्ह झाले आहेत.

एनडीव्हीने दिलेल्या वृत्तानुसार, २० एप्रिलला शिक्षक संध्याला ताप आला होता. नंतर त्यांची कोविड चाचणी पॉझिटीव्ह आली. एका आठवड्यानंतर, त्यांना हैदराबादच्या खासगी रुग्णालयात आयसीयूमध्ये दाखल केले गेले. परंतु ८ मे रोजी त्यांचे निधन झाले. त्या ३५ वर्षांच्या होत्या. पत्नीच्या जाण्याने आमच्या मुलीचे जीवन संपल्याची भावना संध्या यांच्या पतीने व्यक्त केली.

“फक्त माझी पत्नीच नाही, तर माझा जीव गेला आहे. निवडणुका का झाल्या? फक्त एका आमदारासाठी इतके लोक ठार झाले. माझे कुटुंब उध्वस्त झाले. लॉकडाउन किंवा लसीकरणानंतरही निवडणुका होऊ शकल्या असत्या. सर्वांचे लसीकरण झाल्यानंतर सुद्धा निवडणुका होऊ शकल्या असत्या”, असे संध्या यांचे पती म्हणाले.

संध्या निवडणूक ड्युटीसाठी हलिया येथे गेल्या होत्या. तेथे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी दोन दिवसांपूर्वी १४ एप्रिल रोजी एक प्रचंड जाहीर सभा घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री, टीआरएस पक्षाचे उमेदवार आणि शेकडो लोक कोविड पॉझिटिव्ह असल्याचे दिसून आले होते.

तेलंगणा उच्च न्यायालयाने नुकतेच म्हटले आहे की, राज्यात विधानसभा पोटनिवडणुकीदरम्यान करोना संक्रमित झालेल्या सुमारे ५०० शिक्षकांची ओळख पटवून त्यांना कोविड योद्धा म्हणून भरपाई द्यावी. सर्व संक्रमित शिक्षकांचे कुटुंब आता साथीच्या काळात निवडणुका घेण्याच्या सरकारच्या निर्णयावर प्रश्न विचारत आहे.

पत्नीसमवेत मतदान केंद्रावर पोहोचलेल्या मोहन राव यांनी मतदानाच्या दिवशी कोविड प्रोटोकॉलचे उल्लंघन केल्याचा आरोप केला. ३० हून अधिक मतदान कर्मचार्‍यांना एका बसमध्ये भरल्यानंतर मतदान केंद्रावर नेण्यात आले. ते म्हणाले की, सकाळी ७ ते संध्याकाळी ७ या वेळेत मतदानादरम्यान पाच मतदान कर्मचारी आणि चार मतदान एजंट्स यांच्यासह किमान दहा लोक छोट्याशा सरकारी शाळेच्या वर्गात बसले होते.

परिचारकांकडून बॅटरी नसलेले खराब थर्मामीटरने आणले होते. त्यामुळे कोणाचेही तापमान तपासले गेले नाही, असा आरोपही राव यांनी केला. मतदानाच्या शेवटच्या तासात, कोविड पॉझिटिव्ह रूग्ण मत देण्यासाठी आले, तेव्हा मतदान कर्मचार्‍यांना पीपीई किट सुद्धा देण्यात आले नव्हते. मतदान केंद्रावर संध्याचे काम मतदारांच्या बोटावर शाई लावून, ओळख पडताळणी करणे होते. म्हणजेच ती कमीतकमी १ ते २ मिनिटे प्रत्येक मतदारांच्या संपर्कात आली.