दोन दिवसांपूर्वी रिलायन्स जिओचे प्रमुख मुकेश अंबानी यांनी पुढील वर्षाच्या दुसऱ्या सहामाहीत देशात 5G सेवा सुरू करणार असल्याची घोषणा केली होती. परंतु टेलिकॉम क्षेत्रातील दोन दिग्गज मुकेश अंबानी आणि एअरटेलचे प्रमुख सुनील मित्तल यांनी 5G सेवांबाबत परस्पर विरोधी मत व्यक्त केलं आहे. देशात 5G सेवा सुरू होण्यासाठी अजून दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागू शकतो, असं मत सुनील मित्तल यांनी व्यक्त केलं.

आणखी वाचा- 5 G सेवा ते मोबाइल उत्पादन, समजून घ्या पंतप्रधान मोदींचा भारतीय टेलिकॉम क्षेत्रासंबंधीचा दृष्टीकोन

रिलायन्स जिओ २०२१ या वर्षांच्या दुसऱ्या सहामाहीत 5G सेवा सुरू करण्याची तयारी करत असल्याची माहिती मुकेश अंबानी यांनी दिली. दरम्यान, यासाठी धोरणात्मक बदल आणि प्रक्रिया वेगवान करण्याची आवश्यकता आहे. जोपर्यंत धोरणात्मक रित्या यात सुलभता आणली जात नाही आणि स्वस्त सेवा दिली जाणार नाही तोवर सर्वांपर्यंत याचा लाभ पोहोचण्याची शक्यता नसल्याचंही अंबानी म्हणाले होते. “२०२१ या वर्षात रिलायन्स जिओ देशात 5G ची क्रांती घेऊन येणार आहे. संपूर्ण नेटवर्क हे स्वदेशीच असणार आहे. याव्यतिरिक्त हार्डवेअर आणि तंत्रज्ञानही स्वदेशीच असेल. जिओद्वारे आम्ही आत्मनिर्भर भारताचं स्वप्न पूर्ण करणार आहोत,” असंही त्यांनी नमूद केलं होतं.

आणखी वाचा- India Mobile Congress 2020 : 5G सेवांबाबत मुकेश अंबानी यांची मोठी घोषणा, म्हणाले…

सरकारला 5G स्पेक्ट्रमबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यायला हवेत. देशातील 5G सेवांच्या बदलांमध्ये जिओ पुढाकार घेईल. आपण सेमी कन्डक्टरसाठी केवळ आयातीच्या भरवशावर राहू शकत नसल्याचंही त्यांनी नमूद केलं. “देशात सध्या ३० कोटींपेक्षा अधिक २जी सेवा वापरणारे ग्राहक आहेत. या लोकांपर्यंत स्मार्टफोन्स पोहोचणं आवश्यक आहे. त्यासाठी काही धोरणात्मक बदल अपेक्षित आहेत. डिजिटली आपण उत्तमरित्या जोडले गेलो आहोत. असं असलं तरीही आझ ३० कोटी ग्राहक 2G फोनचाच वापर करत आहेत,” असंही अंबानी यांनी स्पष्ट केलं होतं.