पाकिस्तानने भारतासोबत चर्चा करण्यापूर्वी त्यांच्या भूमीवरील दहशतवादी कारवाया नेस्तनाबूत केल्याच पाहिजेत, अशी स्पष्ट भूमिका भारताने घेतलीच पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि खासदार व्यंकय्या नायडू यांनी शुक्रवारी मांडली. गेल्या सोमवारी पूंछमधील नियंत्रणरेषेवर पाकिस्तानी जवानांनी केलेल्या हल्ल्यामध्ये भारताचे पाच जवान शहीद झाले. त्या पार्श्वभूमीवर भारताने पाकिस्तानविरुद्ध कडक पावले उचलली पाहिजेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षासह सर्वच विरोधी पक्षांनी केली आहे. 
नायडू म्हणाले, पाकिस्तानची भूमी दहशतवादी कारवायांसाठी वापरू दिली जाणार नाही, असे आश्वासन परवेझ मुशर्रफ यांनी २००४ मध्ये दिले होते. त्या आश्वासनाची पूर्तता सर्वात आधी पाकिस्तानने केली पाहिजे. त्यानंतरच भारताने पाकिस्तानसोबत चर्चा करावी.
सीमेवर भारतीय जवान शहीद झाल्याची घटना ताजी असतानाच केंद्र सरकार पाकिस्तानबरोबर बोलणी करण्यास तयार असल्याबद्दल त्यांनी यूपीएवर टीका केली.