पुणे-मुंबई द्रुतगती मार्गाच्या धर्तीवर देशात जागतिक दर्जाचे दहा द्रुतगती महामार्ग बांधण्याचे काम सुरू केले जाईल असे सरकारने म्हटले आहे. या महामार्गामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेच्या वाढीस मदत होईल व प्रवासाचा कालावधी कमी होईल, असा आशावाद केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री गडकरी यांनी सांगितले, की नागपूर-मुंबई, बंगळुरू-चेन्नई, बडोदा-मुंबई, कटरा-अमृतसर, लुधियाना-दिल्ली या मार्गाचे काम सुरू करण्यात येईल. त्यामुळे महत्त्वाच्या शहरांचे देशाच्या विकासात योगदान वाढणार आहे. हे महामार्ग जागतिक दर्जाचे असतील व त्यांची गुणवैशिष्टय़े ही प्रगत देशातील रस्त्यांसारखी असतील. हे रस्ते पूर्ण झाल्यानंतर इंधनाची बचतही होईल. गडकरी यांच्या राज्यातील कारकीर्दीत मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग बांधून पूर्ण करण्यात आला होता व ते महाराष्ट्रात फ्लायओव्हरसाठी ओळखले जात होते. बंगळुरू-चेन्नई हा २६० किमीचा मार्ग व इतर मार्ग पूर्ण करण्यास सहा हजार कोटी रुपये लागतील असे सांगून गडकरी म्हणाले, की नागपूर-मुंबई महामार्ग हा नागपूर व औरंगाबाद या दोन शहरांना राज्याच्या राजधानीशी जोडणार आहे त्यामुळे वेळ वाचेल. लुधियाना-दिल्ली मार्ग दोन्ही शहरांतील अंतर ५० किमीने कमी करील व चंडीगडलाही जोडला जाणार आहे. देशांतर्गत उत्पन्नाच्या दोन टक्के खर्च या प्रकल्पांवर केला जाणार असून, त्यामुळे दोन वर्षांत अपघातांचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी होईल. दरवर्षी ५ लाख रस्ते अपघातात किमान तीन लाख लोक जायबंदी होतात तर दीड लाख प्राणास मुकतात. महामार्ग व जहाज बांधणी उद्योगात पन्नास लाख लोकांना रोजगार दिला जाईल. त्यात सहा लाख कोटींचे प्रकल्प आहेत. भारतातील रस्ते एकूण रस्ते- ३३ लाख किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग- ९२८५१ कि.मी. महामार्गाचे प्रमाण- रस्त्यांच्या १.७ टक्के वाहतूक- एकूण वाहतुकीच्या ४० टक्के