काश्मीरमध्ये आणखी एक मोठा दहशतवादी हल्ला झाल्यास भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढेल आणि दोन्ही देशांमध्ये युद्धाची स्थिती निर्माण होऊ शकते. भारताकडून त्यावेळी जोरदार प्रत्युत्तर दिले जाईल असे म्युनिच सिक्युरिटी कॉन्फरन्सच्या वार्षिक अहवालात म्हटले आहे.

वर्षभरातील ज्या १० संघर्षावर प्रामुख्याने लक्ष ठेवण्यात आले, त्यात काश्मीर मुद्दाचाही समावेश होता. रविवारी म्युनिचमधील परिषदेत हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. भारत-पाकिस्तानमधील तणावामुळे काश्मीरचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. पाकिस्तान दहशतवादाचा भारताविरोधात धोरणासारखा वापर करत असल्याचे या अहवालात म्हटले आहे. अफगाणिस्तान, येमेन आणि पर्शियन गल्फच्या बरोबरीने काश्मीरमधील संघर्षावर प्रामुख्याने लक्ष ठेवण्यात आले.

काश्मीरचा विषय आंतरराष्ट्रीय रडारवरुन थोडा बाजूला पडला होता. पण मागच्यावर्षी पुलवामामध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाची स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर पुन्हा एकदा काश्मीरवर जगाचे लक्ष गेले. “भारताकडे पुढचा कुठलाही आराखडा नाहीय. सर्वात मोठा धोका हा आहे की, दहशतवादी हल्ला झाल्यास तणाव वाढू शकतो. उद्या नवीन संकट उभे राहिल्यास जगभरातील देशांना भारत-पाकिस्तानमध्ये शांतता ठेवण्यासाठी पूर्ण ताकत झोकावी लागेल” असे या अहवालात म्हटले आहे.