अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातला नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. जगातलं दारिद्र्य दूर व्हावं यासाठी प्रयत्न केल्याबद्दल अभिजित बॅनर्जी यांना हा पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. हा पुरस्कार तिघांना विभागून देण्यात आला आहे. ज्यामध्ये अभिजित बॅनर्जी, इस्थर डफलो, मायकल क्रेमर अशी या तिघांची नावं आहेत. या तिघांनाही अर्थशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

याआधी अर्थशास्त्रातला नोबेल देऊन अर्थशास्त्रज्ञ अमर्त्य सेन यांना देण्यात आला होता. त्यांच्यानंतर प्रदीर्घ काळाने भारतीय अर्थशास्त्रज्ञाला नोबेल देऊन गौरवण्यात आलं आहे.रविंद्रनाथ टागोर, सी. व्ही. रामन, मदर तेरेसा, अमर्त्य सेन आणि कैलाश सत्यर्थी या पाचजणानंतर नोबेल पुरस्कार जिंकणारे अभिजित बॅनर्जी हे सहावे भारतीय आहेत. तर अमर्त्य सेन यांच्यानंतर अर्थशास्त्रातले नोबेल मिळवणारे अभिजित बॅनर्जी हे दुसरे भारतीय ठरले आहेत.

रविंद्रनाथ टागोर यांना साहित्यातील योगदानासाठी, सी. व्ही. रामन यांना भौतिकशास्त्रातील योगदानासाठी, मदर तेरेसा यांना शांततेचा, अमर्त्य सेन यांना अर्थशास्त्रातील योगदानासाठी, कैलाश सत्यर्थी यांना शांततेचा तर आता अभिजित बॅनर्जी यांना अर्थशास्त्रातील योगदानासाठीचा नोबेल देऊन गौरवण्यात आलं आहे.

का दिला जातो नोबेल पुरस्कार?
आल्फ्रेड बर्नार्ड नोबेल या स्वीडिश रसायनशास्त्रज्ञाच्या नावे दरवर्षी नोबेल पुरस्कार दिला जातो. नोबेल पुरस्कार हा जगातला सर्वोच्च सन्मानाचा पुरस्कार समजला जातो. आल्फ्रेड बर्नार्ड नोबेल यांच्या पाचव्या पुण्यतिथीपासून म्हणजे १० डिसेंबर १९०१ पासून हे पुरस्कार देण्यास सुरुवात झाली. अर्थशास्त्र, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, शरीरविज्ञानशास्त्र, साहित्य आणि शांतता या विभागांमध्ये हे पुरस्कार दिले जातात.