उत्तर-पूर्व दिल्लीतील करावलनगरमध्ये ९ वीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा रहस्यमयरित्या मृत्यू झाल्याचे समोर आल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन अल्पवयीन विद्यार्थ्यांना ताब्यात घेतले आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तुषार (वय १६) हा विद्यार्थी इतर विद्यार्थ्यांना शाळेच्या स्वच्छतागृहात बेशुद्धावस्थेत आढळून आला होता. त्यांनी ही माहिती शाळा प्रशासनाला दिल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर त्याला जीटीबी या मोठ्या रुग्णालयात हालवण्यात आले. मात्र, तेथे तुषारला मृत घोषित करण्यात आले.

दरम्यान, शाळेच्या आवारात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेजवरुन स्वच्छतागृहाच्या बाजूला काही विद्यार्थ्यांबरोबर तुषारचे भांडण झाल्याचे कळते. ज्या तीन विद्यार्थ्यांबरोबर त्याचे भांडण झाले होते. त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, हे तीघेही अल्पवयीन आहेत. यातील एक विद्यार्थी फरार झाला आहे.

मृत तुषारच्या कुटुंबियांचे म्हणणे आहे की, तुषारला त्याच्या वर्गमित्रांनी मारहण केली होती. त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला आहे. पालकांच्या मागणीवरुन या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. शुक्रवारी याप्रकरणी मृत विद्यार्थ्याचे शवविच्छेदन केले जाणार आहे. त्यानंतर त्याचा मृत्यू नक्की कशामुळे झाला हे स्पष्ट होऊ शकणार आहे.