पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या शौर्याला देश कधी विसरणार नाही आणि विसरुही देणार नाही, असे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी म्हटले आहे. केंद्रीय रिझर्व्ह पोलीस बलाच्या (सीआरपीएफ) ८० व्या वर्धापनदिनानिमित्त हरयाणातील गुरुग्राम येथे आयोजित कार्यक्रमात राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली.

यावेळी डोवाल यांनी सीआरपीएफचे योगदान महत्वाचे असल्याचे सांगताना म्हटले की, अंतर्गत सुरक्षा महत्वाची असते. दुसऱ्या जागतीक युद्धानंतर ३७ देश असे होते जे उद्धवस्त झाले आणि आपले सार्वभौमत्व गमावून बसले. यामधील २८ देशांचे कारण त्यांचा देशांतर्गत संघर्ष हे होते. देश दुबळा असतो कारण त्याची अंतर्गत सुरक्षेत कमजोर असते, त्यामुळे याची जबाबदारी सीआरपीएफवर येते.


यावेळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी भारताच्या फाळणीवेळी सीआरपीएफच्या योगदानाचे कौतुक केले. त्यांनी म्हटले की, कदाचित लोक विसरले असतील की, भारत-पाकिस्तानच्या विभाजनानंतर खूपच कमी संख्या असतानाही सीआरपीएफने सुरक्षेच्या दृष्टीने जी महत्वाची भुमिका निभावली त्यावर एक पुस्तक लिहीले जाऊ शकेल.

डोवाल म्हणाले, सीआरपीएफच्या गणवेशाशी आणि भारताच्या सुरक्षेशी मी ५१ वर्षांपासून जोडलो गेलो आहे. यांपैकी ३७ वर्षे मी पोलीस खात्याचा भाग होतो. मला लष्कर आणि पोलिसांसोबत काम करण्याची संधी मिळाली. मात्र, आपल्या बलाचे काही वैशिष्ट्ये आहेत. हेच एक बल आहे ज्यामध्ये इतकी विविधता आहे. व्हीआयपी सुरक्षा, दहशतवाद, कठीण भागात कर्तव्य बजावणे तसेच ईशान्य भारताच्या आव्हानांसह ज्या ज्या ठिकाणी गरज पडली तिथे सीआरपीएफने महत्वाचे योगदान दिले.