दिल्लीत शेतकरी आंदोलना दरम्यान प्रजासत्ताक दिनी आयोजित ट्रॅक्टर रॅली दरम्यान उफाळलेल्या हिंसाचारामुळे व लाल किल्ल्यावर घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान मोदी यांनी आपल्या मन की बात कार्यक्रमात भाष्य केलं. ”दिल्लीत २६ जानेवारी (प्रजासत्ताक दिनी) रोजी तिरंगा ध्वजाचा अपमान पाहून देश खूप दुःखी झाला.” असं पंतप्रधान मोदी यांनी बोलून दाखवलं.

तसेच, ”आपल्याला येणाऱ्या काळाला नवीन आशा व नाविन्याने भरायचं आहे. आपण मागील वर्षी असाधरण संयम व धैर्याचा परिचय दिला. या वर्षात देखील कठोर मेहनत घेऊन आपल्याला संकल्प पूर्ण करायचे आहेत. आपल्या देशाला अधिक गतीने पुढे न्यायचं आहे. असं देखील यावेळी मोदी म्हणाले.”

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज  रेडियो कार्यक्रम ‘मन की बात’च्या माध्यमातून देशातील नागरिकांशी संवाद साधला. आज जानेवारी महिन्याचा शेवटचा रविवार आहे व नवीन वर्ष (२०२१) मध्ये होत असलेला हा पहिलाच कार्यक्रम होता. पंतप्रधान मोदी यांचा ‘मन की बात’ कार्यक्रम प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी प्रसारित होत असतो.

या अगोदर शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बोलताना पंतप्रधान मोदी यांनी,”मी नरेंद्र सिंह तौमर यांनी सांगितलेलाच मुद्दा पुन्हा एकदा सांगू इच्छितो. शेतकरी आणि सरकार यांच्यात अंतिम तोडगा भलेही निघाला नसेल, पण सरकार शेतकऱ्यांसमोर पर्याय ठेवत आहे. शेतकऱ्यांनी यावर चर्चा करावी.” असं सांगितलं होतं. तसेच, शेतकऱ्यांपासून आपण फक्त एका कॉलच्या अंतरावर आहेत, असंही मोदी म्हणाले होते.