शेतकरी आंदोलन मोदी सरकारने अत्यंत गांभीर्यानं घ्यायला हवं अन्यथा सध्या जी परिस्थिती उद्भवली आहे ती कायम राहिल्यास देशासाठी ते चांगलं नसेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी केंद्र सरकारला दिला आहे.

पवार म्हणाले, “मला वाटतं सरकारनं संपूर्ण आंदोलनं अत्यंत गांभीर्यानं घ्यायला हवं. यावर चर्चेद्वारे तोडगा काढला जाऊ शकतो. मी असंही ऐकलंय की आंदोलनादरम्यान चार ते पाच जणांनी आत्महत्या केल्या आहेत. जर अशा प्रकारची परिस्थिती उद्भवत असेल तर हे देशासाठी चांगलं नाही.”

दरम्यान, केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि त्यांच्या सरकारमधील कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर सध्याच्या शेतकरी आंदोलनाबाबतच्या भूमिकेवरुन टीका केली आहे. तोमर यांनी म्हटलं की, मनमोहन सिंग आणि शरद पवार यांची कृषी क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्याची इच्छा होती. मात्र, त्यांच्यावर दबाव असल्याने ते याची अंमलबजावणी करु शकले नाहीत. मात्र, आता या सुधारणा घडून येऊ पाहत आहेत तर शरद पवार त्याला विरोध करत आहेत.