संसदेचे पावसाळी अधिवेशन १९ जुलैपासून सुरू होऊ शकते. संसदीय कामकाज मंत्रिमंडळाच्या समितीने १९ जुलै ते १३ ऑगस्ट दरम्यान संसदेचे पावसाळी अधिवेशन घेण्याची शिफारस केली आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या तारखा ठरवण्यासाठी गेल्या आठवड्यात समितीची बैठक घेण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे, परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अद्याप यासंदर्भात अंतिम मंजुरी दिली नाही.

सूत्रांच्या माहितीनुसार, संसदेच्या या अधिवेशनात २० दिवस कामकाज चालेल. या दरम्यान, सरकार अनेक बिले सादर करु शकते. या दरम्यान, करोना आणि कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकरी आंदोलनाचा मुद्दा विरोधक उपस्थित करू शकतात.

हेही वाचा- Central Vista: “फक्त याच प्रकल्पाला विरोध का?” सुप्रीम कोर्टाचा सवाल; फेटाळली स्थगिती याचिका

करोना नियमांचे होणार पालन

अधिवेशनात कोविडशी संबंधित सर्व प्रोटोकॉलचे पालन केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. संसदेत प्रवेश करणाऱ्या सर्वांनी करोना लसीचा किमान एक डोस घेतला असेल, हे तपासल्या जाणार आहे.