देशात सध्या करोनाची दुसरी लाट सुरू आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पत्रकारपरिषद घेत मोदी सरकारवर निशाणा साधला. तसेच, लसीकरणाबाबत योग्य नियोजन केलं गेलं नाही तर करोना महामारीच्या अनेक लाटा येतच राहातील, असा इशारा देखील दिला आहे.

राहुल गांधी म्हणाले, “अनेकदा सरकारला करोना संदर्भात सतर्क केलं होतं. मात्र सरकारने आमची चेष्टा केली. आणि जसं की तुम्ही पाहिलं मोदींनी करोनाविरुद्ध विजय घोषित केला. त्यांनी करोनाला हरवलं असल्याचं जाहीर केलं. मात्र अडचण ही आहे की, सरकारला व पंतप्रधानांना करोना समजलाच नाही, आजपर्यंत समजला नाही.”

तसेच, “करोना केवळ एक आजार नाही, करोना हा बदलत असलेला आजार आहे. जेवढा वेळ तुम्ही त्याला द्याल हा तेवढाच घातक होत जाईल. मी मागील वर्षी फेब्रुवारीत म्हटलं होतं, करोनाला तुम्ही वेळ देऊ नका, जागा देऊ नका, दरवाजा बंद करा.” असंही यावेळी राहुल गांधी म्हणाले.

“सकारात्मकता हा मृत्यूचे आकडे लपवण्यासाठी मोदींनी केलेला PR स्टंट” : राहुल गांधी

याचबरोबर “करोना रोखण्याची  काय पद्धत आहे? करोना आक्रमण कसं करतो? सर्वात अगोदर ज्या लोकांकडे अन्न नाही, जे कमकुवत आहेत त्यांच्यावर हा आक्रमण करतो. दुसरीकडे ज्यांना कोमोरबिडिटीज आहेत, ज्यांना मधुमेह आहे, ज्यांना हृदयाशी निगडीत विकार आहेत अशांवर हा आक्रमण करतो आणि हा हळूहळू बदलत जातो. जेवढी तुम्ही त्याला जागा द्याल तो बदलत राहील व अधिक घातक बनेल. करोनाला रोखण्याच्या तीन-चार पद्धती आहेत. त्यापैकी एक कायमचा उपाय म्हणजे लस आहे. लॉकडाउन शस्त्र आहे, मात्र यामळे लोकांना अनेक यातना सहन कराव्या लागत आहेत. हा उपाय नाही, हा तात्पुरता उपाय आहे. सोशल डिस्टंन्सिंग व मास्क देखील तात्पुरते उपाय आहेत. लस कायमचा उपाय आहे. पण जर का तुम्ही लस लवकर घेतली नाही, तर विषाणून आपल्या लसीच्या पकडीतून सटकून जाईल. कारण, जर तुम्ही विषाणूला भारतात चालू दिलं, रोखलं नाही. तर तो बदलत राहील व घातक बनेल.” असं देखील राहुल गांधींनी बोलून दाखवलं.

“लसीकरणाबाबत मी थेट पंतप्रधानांना म्हटले होते की, जर भारताने लसीकरणाचे योग्य नियोजन केले नाही तर एकदा नाही तर अनेकदा लोकं मरतील. एक-दोन लाटा नाही येणार तर लाटा येतच राहातील. कारण विषाणू बदलत राहील.” असा इशारा देखील यावेळी राहुल गांधींनी दिला.