पुलवामा येथे झालेल्या हल्ल्यानंतर दहशतवादाविरोधात सगळा देश एकवटला आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सकाळी सर्वपक्षीय बैठक पार पडली. या बैठकीत आम्ही दहशतवाविरोधात लढण्यासाठी सरकारला पूर्णपणे सहकार्य करणार असल्याचं विरोधी पक्षांनी मान्य केलं. या बैठकीत राजनाथ सिंह यांनी सर्वपक्षीय नेत्यांना पुलवामा हल्ल्याची माहिती दिली. आपल्या देशातून दहशतवाद उखडून टाकण्यासाठी आपण एकत्र येऊ असे आवाहन राजनाथ सिंह यांनी केले जे सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी स्वीकारले. या बैठकीत पुलवामा हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदवण्यात आला. तसेच एक त्रिसूत्री प्रस्तावही मंजूर करण्यात आला.

काय आहे त्रिसूत्री प्रस्तावात?
1) 14 फेब्रुवारीला पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध नोंदवतो. या हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. या शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांसोबत सगळा देश आहे, त्यांच्या दुःखात सहभागी आहे.

2) देशाच्या सीमेवर वाढणाऱ्या दहशतवादी कारवायांचाही निषेध नोंदवण्यात आला

3) मागील 3 दशकांपासून भारत सीमेवरच्या दहशतवादी कारवायांचा सामना करतो आहे, भारतात पसरलेल्या दहशतवादाला सीमेवर खतपाणी मिळते आहे. भारत या आव्हानांचा सामना नेटाने करतो आहे, या लढाईत संपूर्ण देश एकवटला आहे. दहशतवादाविरोधात लढण्यासाठी सुरक्षादलांसोबत, सैन्यासोबत सगळा देश उभा आहे

सर्वपक्षीय बैठकीत गृहसचिव राजीव गौबा, केंद्रीय राखीव पोलीस दलाचे वरिष्ठ अधिकारीही हजर होते. त्याचप्रमाणे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूक अब्दुल्ला, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, लेफ्टचे नेते डी. राजा, शिवसेना खासदार संजय राऊत, काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद आणि आनंद शर्मा यांची उपस्थिती होती.