एकट्या दिल्ली शहरामध्येच गांधी कुटुंबियांची ६४ ठिकाणांना नावे देण्यात आलेली आहेत, असे म्हणत अभिनेते ऋषि कपूर यांनी पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ऋषि कपूर यांनी दिल्ली शहरात गांधी कुटुंबियांची नावे देण्यात आलेल्या ठिकाणांचे एक छायाचित्र ट्विट करून या स्मारकांना खरचं एखाद्याच्या कुटुंबियांची नावे देण्याची गरज आहे का? असा सवाल उपस्थित केला आहे.

तत्पूर्वी, देशातील महत्त्वाच्या संस्था आणि ठिकाणांना काँग्रेसने आपल्या राजवटीत नेहरू-गांधी घराण्यातील व्यक्तींची नावे दिल्यावरून ऋषि कपूर यांनी एकापाठोपाठ एक ट्विट करून जोरदार हल्ला चढवला होता. या टीकेनंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी कपूर यांच्या वांद्रे येथील निवासस्थानाबाहेर निदर्शने करून दगडफेक केली आणि घोषणाबाजी केली गेली. आता पुन्हा ऋषि कपूर यांनी काँग्रेसवर निशाणा साधत ट्विटरवर पोस्ट केलेल्या छायाचित्राने कपूर आणि काँग्रेसमध्ये संघर्ष पेटण्याची दाट शक्यता आहे.