दिल्लीतील काही लोक मला सतत टोमणे मारत अपमान करत असतात. त्यांना मला लोकशाहीचे धडे द्यायचे आहेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. तसंच हे लोक मला लोकशाही शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत असं म्हणत मोदींनी अप्रत्यक्षपणे राहुल गांधींच्या टीकेला उत्तर दिलं आहे. केंद्रशासित प्रदेशातील नागरिकांना आरोग्य विमा संरक्षण देण्यासाठी आयुषमान भारत योजना लाँच केल्यानंतर ते बोलत होते.

देशातील लोकशाही संपुष्टात आली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात बोलणाऱ्या प्रत्येकाला दहशतवादी ठरवले जात आहे. दिल्लीच्या वेशीवर आंदोलक शेतकऱ्यांची पंतप्रधानांना काळजी नसून ते अत्यंत अकार्यक्षम आहेत. तीन-चार कुडमुडय़ा भांडवलदारांच्या आधारे मोदी देश चालवत असून त्यांच्यासाठी पसे उभे करण्यात गुंतलेले आहेत, असे गंभीर आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केले आहेत. त्यांच्या या आरोपांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर दिलं आहे.

“दिल्लीतील काही लोक मला नेहमी टोमणे मारत अपमान करत असतात. त्यांना मला लोकशाहीचे धडे द्यायचे आहेत. त्यांना मला सांगायचं आहे की जम्मू काश्मीरमधील जिल्हा विकास परिषदेच्या निवडणुका लोकशाहीचं उदाहरण आहे,” असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.

“काही राजकीय लोक सारखं लोकशाहीवर लेक्चर देत असतात. पण त्यांचा दुटप्पीपणा आणि खोटारडेपणा तर पहा की सुप्रीम कोर्टाने दिलेल्या आदेशानंतरही पाँडिचेरीमध्ये स्थानिक निवडणूक झालेली नाही. तर दुसरीकडे जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेश झाल्यानंतर एका वर्षाच्या आतच पंचायत स्तरीय निवडणुका झाल्या आहेत,” असंही नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. नरेंद्र मोदींनी यावेळी जम्मू काश्मीरमधील स्थानिक निवडणुकांमुळे लोकशाहीचा पाया घट्ट झाल्याचं सांगत मतदारांचं अभिनंदन केलं.