देशात करोनाग्रस्तांच्या संख्येच्या वाढीच्या दरात ४० टक्के घट झाली असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. करोना रुग्णांची संख्या १००७ ने वाढली आहे आणि  १३ हजार ३८७ झाली आहे. तर २४ तासात २३ जणांचा मृत्यू करोनामुळे झाला आहे असंही स्पष्ट करण्यात आलं आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सह सचिव लव अग्रवाल यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. जरा करोनाग्रस्तांच्या वाढीचा वेग बघितला तर देशात करोना रुग्णांच्या संख्येत ४० टक्के घट झाली आहे. आपण करोनाशी कसोशीने लढा देत आहोत असंही त्यांनी म्हटलं आहे.

१५ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत आढळलेले रुग्ण आणि १ एप्रिलपासून आजपर्यंत आढळलेले रुग्ण यांची तुलना केली असता एप्रिल महिन्यात हे प्रमाण कमी झाल्याचं दिसतं आहे. विशेष म्हणजे आपण चाचण्यांची संख्या वाढवली आहे तरीही करोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं दिसून येतं आहे असंही अग्रवाल यांनी स्पष्ट केलं.

देशभरात करोनाग्रस्तांची संख्या १ हजार ७ ने वाढली आहे. ही बाब निश्चितच काळजी वाढवणारी आहे. मात्र करोनाग्रस्तांची वाढीचा वेग मात्र मंदावलाय ही बाब काहीशी दिलासा देणारी आहे. करोना नियंत्रणात आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.