सध्याच्या घडीला भारतात काही प्रमाणात असंवेदनशीलता अस्तित्त्वात आहे. काही मुद्द्यांवर लोक अतिसंवेदनशील पद्धतीने व्यक्त होत असल्याचे मत बॉलीवूड अभिनेत्री काजोल हिने व्यक्त केले. जयपूर येथे सुरू असलेल्या साहित्य संमेलनादरम्यान शनिवारी काजोलने हे वक्तव्य केले. मला असे वाटते की, भारतात काही प्रमाणात असंवेदनशीलता आहे. आपण काही मुद्द्यांवर अतिसंवेदनशीलपणे व्यक्त होत आहोत. एखाद्या वक्तव्यातील शब्दांचे मुल्यमापन झाले पाहिजे आणि ते वक्तव्य कशासंदर्भात आहे, हे बघणे गरजेचे आहे. सार्वजनिक जीवनात वावरताना योग्य आणि बौद्धिकतेला साजेसे असे बोलणे हे आपले कर्तव्य असल्याचे काजोलने यावेळी सांगितले. काही दिवसांपूर्वीच बॉलीवूडमधील निर्मात-दिग्दर्शक करण जोहर याने भारतात अभिव्यक्तीस्वातंत्र्यावर बंधने असल्याचे म्हटले होते. एखादे मत व्यक्त करताना तुमच्या डोक्यावर सतत कायदेशीर तलवार टांगती असल्याचे त्यांने सांगितले होते.