देशामध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला आहे. अनेक राज्यांमधील करोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्यासंख्येने रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य व्यवस्थेवर कमालीचा ताण पडला आहे. केंद्र सरकारने करोनाच्या दुसऱ्या लाटेसंदर्भात देण्यात आलेला इशारा गांभीर्याने घेतला नाही म्हणून आज ही परिस्थिती निर्माण झाल्याची टीका विरोधी पक्ष करत आहेत. अशातच आता एमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनीही मोदी सरकारवर टीका करताना वैज्ञानिकांच्या इशाऱ्याकडून दुर्लक्ष करुन सरकार झोपा काढत राहिल्याचा टोला लगावला आहे. एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना ओवेसी यांनी लसीकरण आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यावरुन मोदी सरकारवर निशाणा साधलाय. "लसीकरण मोहिमेमध्ये केंद्राला अपयश आलं आहे. राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना ऑक्सिजनचा आणि लसींचा पुरवठा करण्यात केंद्राला अपयश आलं. लसींच्या वितरणाचा हक्क केंद्राकडे राखीव असल्याने असं घडलं. वैज्ञानिकांनी दुसऱ्या लाटेसंदर्भात दिलेल्या इशाऱ्यानंतरही ते झोपून राहिले. सरकार पूर्णपणे अपयशी ठरलं आहे," अशी टीका ओवेसी यांनी केलीय. Centre failed in their vaccination policy, they failed in providing oxygen to state govts & UTs because the supply of vaccine is in the exclusive domain of union govt. They slept on their own scientists' warning that 2nd wave will come but despite that, the govt failed: Owaisi pic.twitter.com/yHggPl3a94 — ANI (@ANI) May 10, 2021 दोन दिवसांपूर्वीच ओवेसी यांनी देशातील सद्य परिस्थितीसाठी केंद्र सरकारला जबाबदार असल्याचं ट्विटरवरुन म्हटलं होतं. करोनामुळे आपल्या प्रियजनांना गमावलेल्या लोकांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माफी मागावी, अशी मागणी ओवेसी यांनी केली होती. "पंतप्रधान संसद आणि पत्रकार परीषदांना सामोरे जाण्यास घाबरतात. ते स्मशानभूमी आणि कब्रिस्तान बद्दल तासनतास बोलू शकतात, परंतु ते रुग्णालयांबद्दल कधीही बोलू शकत नाहीत. ज्यांनी ऑक्सिजन, बेड्स, औषधांच्या कमतरतेमुळे आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांची मोदींनी माफी मागावी", असे ओवेसी यांनी म्हटलं होतं. | @PMOIndia is scared to face parliament & press He could talk for hours about shamshans & kabristans but never about hospitals He must apologise to people who lost loved ones to shortage of oxygen, beds, medicines etc. He must be held accountable for this preventable suffering — Asaduddin Owaisi (@asadowaisi) May 9, 2021 दरम्यान, लोकसभेतील काँग्रेसचे गटनेते व पश्चिम बंगालचे प्रदेशाध्यक्ष अधीर रंजन चौधरी यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना करोनाच्या पार्श्वभूमीवर संसदेचं विशेष अधिवेशन बोलवण्यासंदर्भातील मागणी करणारं पत्र लिहिलं आहे. भारतामध्ये १ ऑगस्टपर्यंत १० लाख लोकांचा करोनामुळे मृत्यू होईल असं नुकतच द लॅन्सेटच्या अहवालात म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर संसदेचं अधिवेशन भरवून चर्चा केल्यास सरकारला करोनाविषयक धोरणे ठरवण्यासाठी मदत होईल असं या पत्रात अधीर रंजन यांनी म्हटलं आहे.