देशातील विद्यार्थ्यांसोबत केंद्र सरकारने युद्धच पुकारले असल्याची टीका दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मंगळवारी नवी दिल्लीमध्ये केली. हैदराबाद विद्यापाठातील विद्यार्थी रोहित वेमुलाच्या आत्महत्येच्या पार्श्वभूमीवर देशातील विविध संघटनांनी मंगळवारी जंतर मंतरवर मोर्चा काढला होता. या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी अरविंद केजरीवाल हे सुद्धा जंतर मंतरवर पोहोचले. यावेळी केलेल्या छोट्या भाषणात त्यांनी भाजप सरकारवर टीका केली.
रोहित वेमुला याला आत्महत्येस प्रवृत्त करण्यास केंद्रातील सर्व मंत्रीच जबाबदार आहेत, असा गंभीर आरोपच केजरीवाल यांनी यावेळी केला. त्याचबरोबर देशातील सर्वच विद्यार्थ्यांसोबत सरकारने युद्धच पुकारले असल्याचे त्यांनी सांगितले.
अरविंद केजरीवाल यांच्यापूर्वी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनीही आंदोलक विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी सुद्धा भाजप सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर यावेळी जोरदार टीका केली.