जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री आणि पीपल्स डेमोक्रेटिक पक्षाच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनी मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. पाकिस्तान व चीनसह नेपाळ, बांगलादेश व श्रीलंकेशी भारताच्या संबंधावरून त्यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

“पाकिस्तान आणि चीन व्यतिरिक्त आपले नेपाळ, बांगलादेश व श्रीलंकेशी देखील चांगले संबंध नाहीत. जेव्हा पाकिस्तान सोबत संबंध खराब असतात, तेव्हा सीमेवरील लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. चीन बरोबरचे संबंध बिघडले तेव्हा आपल्या २२ जवानांना जीव गमावावा लागला. हे सरकार निवडणूक जिंकणारी मशीन आहे.” असं मुफ्ती यांनी म्हटलं आहे.

जम्मू काश्मीरमधून कलम ३७० हटवल्याच्या मुद्यावरून केंद्र सरकारवर टीका करताना या अगोदपर मुफ्ती यांनी म्हटले होते की, “ केंद्र सरकार लोकांचा आवाज दाबत आहे आणि त्यांना बोलण्याची परवानगी दिली जात नाही. हे एका प्रेशर कुकरप्रमाणे आहे. त्यांनी अशी परिस्थिती निर्माण केली आहे. परंतु प्रेशर कुकरचा जेव्हा स्फोट होतो तेव्हा तो पूर्ण घराला जाळून टाकतो. एक वेळ अशी येईल जेव्हा सरकार हात जोडून विचारेल की राज्याला विशेष दर्जा पुन्हा देण्याव्यतिरिक्त आणखी काय हवं”