जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) झालेला हल्ला हा स्पष्टपणे कट होता, असा गंभीर आरोप काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि ज्येष्ठ विधीज्ञ कपिल सिब्बल यांनी केला आहे. यासाठी त्यांनी काही प्रश्न देखील उपस्थित केले आहेत. तसेच याप्रकरणी चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे.

जेएनयूतील हिंसाचारावर प्रतिक्रिया देताना सिब्बल म्हणाले, चेहरा झाकलेल्या लोकांना विद्यापीठाच्या आवारात प्रवेश कसा देण्यात आला? हल्ल्यावेळी कुलगुरु काय करीत होते? पोलीस विद्यापीठाच्या आवाराबाहेर का थांबले होते? हे घडत असताना केंद्रीय गृहमंत्री काय करीत होते? हे सर्व प्रश्न अद्याप अनुत्तरित आहेत. यामुळेच हा हल्ला म्हणजे कट असल्याचे स्पष्ट होते.

आणखी वाचा – JNU Violence: जेएनयूचे माजी विद्यार्थी असलेल्या मोदी सरकारच्या मंत्र्यांकडून निषेध

दिल्लीतील प्रतिष्ठित जवाहरलाल नेहरु विद्यापीठात (जेएनयू) रविवारी रात्री काही चेहरे झाकलेल्या गुंडांनी विद्यार्थ्यांवर आणि प्राध्यापकांवर जीवघेणा हल्ला केला. हा हल्ला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) विद्यार्थी कार्यकर्त्यांनी केल्याचा आरोप जेएनयूच्या विद्यार्थ्यांनी केला आहे. दरम्यान, या हल्ल्याच्या निषेधार्थ देशभरातील विद्यार्थी संघटना मध्यरात्रीपासूनच रस्त्यावर उतरल्या असून ठिकठिकाणी आंदोलने सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

आणखी वाचा – JNU Violence: पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या डोक्यात लाथा मारल्या – प्रियंका गांधी

त्याचबरोबर, मनुष्यबळ विकास मंत्रालयाने या हल्ल्याबाबत विद्यापीठाचे निबंधक प्रमोद कुमार यांच्याकडून तातडीने अहवाल मागवला आहे. देशभरातील बुद्धिवंत, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि विरोधी पक्षांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध केला आहे. हल्ल्यामागे केंद्रातील सत्ताधारी भाजपचा हात असल्याचा आरोप आप’सह अनेक विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केला आहे.