भारतीय जनता पार्टीने एनडीएमधील आपला सहकारी पक्ष असलेल्या जदयूला अरुणाचल प्रदेशमध्ये मोठा झटका दिला आहे. जयदूच्या सात पैकी सहा आमदारांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. याबाबत जदयूमध्ये तीव्र नाराजी असल्याचे दिसत आहे. जदयूचे राष्ट्रीय प्रवक्ता केसी त्यागी यांनी यावर थेट माध्यमांसमोरच प्रतिक्रिया दिली आहे. हे आघाडीच्या राजकारणासाठी चांगलं लक्षण नसल्याचं त्यागी यांनी म्हटलं आहे.

अरुणाचल प्रदेशमध्ये जदयूच्या सहा आमदारांनी भाजपात प्रवेश केला, याबाबत आम्ही नाराजी व्यक्त करत आहोत. आघाडीच्या राजकारणासाठी हे चागले संकेत नाहीत. असं केसी त्यागी यांनी म्हटलं आहे. पाटणा येथील पत्रकारपरिषदेत त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.

तसेच, बिहारमधील आघाडीबाबत काही वाद नाही. अरुणाचलमधील घटनेचा बिहारमधील राजकारणावर कोणताही परिणाम होणार नाही. असे देखील यावेळी केसी त्यागींनी स्पष्ट केले.

अरुणाचल प्रदेशमध्ये भाजपाचा नितीश कुमारांना मोठा झटका!

यावेळी जदयूचे सरचिटणीस केसी त्यागी यांनी लव्ह जिहाद बाबत देखील भूमिका स्पष्ट केली. लव्ह जिहादच्या नावाखील देशात द्वेष व फूट पाडण्याचे वातावरण निर्माण होत आहे. घटना आणि सीआरपीसीच्या तरतुदींमुळे दोन प्रौढांना एखाद्याच्या धर्माचा किंवा जातीचा विचार न करता त्यांच्या आवडीचा जीवनसाथी निवडण्याचे स्वातंत्र्य मिळते. असं त्यागी म्हणाले.

बंगालच्या निवडणुकीची रुपरेषा पक्षाचे प्रभारी आणि अध्यक्ष एक-दोन दिवसात निश्चित करतील. शेतकरी आंदोलनाबाबत पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे. बिहारमधील विरोधी नेते जे शेतकरी आंदोलनाबाबत चिंता व्यक्त करत आहेत, त्यांची कुठलीच शेतकरी संघटना नाही. असं देखील त्यागींनी यावेळी सांगितलं.