काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांचे मत
काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांना पक्षाचे अध्यक्ष करावे अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. खासदार अमरिंदरसिंग यांच्यापाठोपाठ आता राजस्थान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सचिन पायलट यांनीही ही मागणी केली आहे.
अलीकडेच झालेल्या बिहार विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची कामगिरी उंचावल्याने पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यात उत्साहाचे वातावरण आहे, असे पायलट यांनी म्हटले आहे. बिहारमधील कामगिरीचे श्रेय राहुल गांधी यांना असल्याचे पायलट यांचे म्हणणे आहे. गेल्या जवळपास २५ वर्षांपासून बिहारमध्ये काँग्रेसचे विशेष अस्तित्व नव्हते, मात्र राहुल गांधी यांच्या प्रयत्नामुळे गेल्या निवडणुकीच्या तुलनेत या वेळी पक्षाची कामगिरी उल्लेखनीय झाली आहे, असेही ते म्हणाले.
काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाची धुरा राहुल गांधी यांच्याकडे सोपविण्याबाबत विचारले असता पायलट म्हणाले की, काँग्रेस कार्यकारी समिती, पक्षाध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे योग्य वेळी निर्णय घेतील, मात्र राहुल गांधी यांनी पक्षाची धुरा सांभाळण्याची योग्य वेळ आली आहे.