जे शेतकऱ्यांसाठी मगरीचे अश्रू ढाळत होते, त्यांना तुम्ही विचारलं पाहिजे की यापूर्वी सिंचनाच्या योजना का पूर्ण झाल्या नाहीत. त्यांना शेतकऱ्यांची कोणतीच चिंता नाही. त्यांनी फक्त कोट्यवधी रूपये वाया घातले, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसवर टीकास्त्र सोडले. पूर्वीच्या सरकारने दीड पट हमीभावाबाबत विचारही केला नाही. पण आम्ही हमीभावाबाबत दिलेले वचन पूर्ण केले. पूर्वीचे सरकार फक्त बोलत होते. पण आम्ही आश्वासने पाळली, असेही मोदींनी म्हटले. मिर्झापूर येथील जाहीर सभेत ते बोलत होते.

पंतप्रधान मोदी हे दोन दिवसांच्या पूर्वांचल दौऱ्यावर आहेत. वाराणसीनंतर आज (रविवार) ते केंद्रीय गृहमंत्री यांचा गृहजिल्हा मिर्झापूर येथे आले होते. २०१९ च्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदींचा हा पूर्वांचल दौरा महत्वाचा मानला जातो. मिर्झापूर येथे अनेक योजनांचे त्यांनी उद्घाटन केले.

ते म्हणाले, शेतकऱ्यांना मोठा फायदा व्हावा अशी यंत्रणा तयार केली जात आहे. पूर्वी युरिया घेण्यासाठी लाठीमार होत होता. पण मागील चार वर्षांत अशा घटना ऐकण्यासही मिळाल्या नाही. सेवक या नात्याने मी हमीभाव दीड पट करण्याचा शब्द दिला होता. ते प्रत्यक्षात अंमलात आणले आहे. खरिपाच्या १४ पिकांना २०० ते १८०० पर्यंत वाढ देण्यात आली आहे. यामुळे उत्तर प्रदेशसह पूर्वांचलच्या शेतकऱ्यांना मोठा लाभ होणार आहे.

मोदींनी यावेळी शेतकऱ्यांना बांबूची शेती करण्याचा सल्ला दिला. यासाठी आम्ही कायद्यात बदल केला आहे. पूर्वी बांबूला वृक्ष मानले जात. पण आम्ही बांबू हे गवत असल्याचे सांगितले. त्यामुळे शेतकरी आता बांबूची शेती करू शकतात. त्यामुळे बांबू आयात करणे बंद होईल.