आंध्र प्रदेश विधान परिषद बरखास्त करण्याचा निर्णय मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी सरकारने घेतला. कोणत्याही राज्य विधानसभेला विधान परिषद अस्तित्वात आणणे किंवा बरखास्त करण्याचा ठराव करण्याचा अधिकार आहे. घटनेतील १६९ व्या तरतुदीनुसार विधान परिषद स्थापन करणे किंवा बरखास्त करण्याकरिता संसदेची मान्यता आवश्यक असते. आंध्र प्रदेशातील विधान परिषद बरखास्त करण्याचा निर्णय अमलात आणण्याकरिता संसदेत त्याला मान्यता घ्यावी लागेल.

सध्या किती राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहे?-

देशात सध्या महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या सहाच राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आहेत. जम्मू आणि काश्मीर या राज्यातही विधान परिषद कार्यरत होती, पण घटनेच्या ३७०व्या कलमानुसार असलेले विशेषाधिकार रद्द करण्यात आले आणि राज्याला केंद्रशासित दर्जा बहाल करण्यात आला.  बदलानंतर जम्मू आणि काश्मीरमधील विधान परिषदेचे अस्तित्व संपुष्टात आले.

किती राज्यांमध्ये विधान परिषद बरखास्त करण्यात आली?-

आतापर्यंत पश्चिम बंगाल (१९६९), पंजाब (१९७०), तमिळनाडू (१९८६), आंध्र प्रदेश (१९८५), जम्मू आणि काश्मीर (२०१९) या राज्यांमधील विधान परिषद बरखास्त करण्यात आल्या. आसाम राज्यात स्वातंत्र्यापूर्वी विधान परिषद अस्तित्वात होती. स्वातंत्र्य मिळाल्यावर १९४७ मध्ये आसाममधील विधान परिषद बरखास्त करण्यात आली होती. आंध्र प्रदेशमध्ये एन. टी. रामाराव सरकारने विधान परिषद बरखास्त केली होती. विद्यमान मुख्यमंत्री जगनमोहन यांचे वडील वाय. एस. चंद्रशेखर रेड्डी हे मुख्यमंत्रिपदी असताना २००५ मध्ये विधान परिषद पुन्हा कार्यरत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आंध्रत पुन्हा विधान परिषद बरखास्त करण्याचा निर्णय झाला आहे. तमिळनाडूत एम. जी. रामचंद्रन हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळात विधान परिषद बरखास्त करण्याचा निर्णय झाला होता. २०१० मध्ये करुणानिधी यांच्या नेतृत्वाखालील द्रमुक सरकारने विधान परिषद पुन्हा कार्यरत करण्याचा ठराव केला होता, पण केंद्राच्या पातळीवर हालचाल झाली नाही.

कोणत्या राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आणण्याचा निर्णय झाला आहे?-

ओडिशा, राजस्थान, मध्य प्रदेश, आसाम आदी राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात आणण्याचा निर्णय झाला आहे. यापैकी मध्य प्रदेश वगळता तीन राज्यांचे प्रस्ताव केंद्र सरकारकडे आहेत. मध्य प्रदेशात काँग्रेस पक्षाने जाहीरनाम्यात विधान परिषद आणू असे आश्वासन दिले होते. त्याची पूर्तता करण्याकरिता मुख्यमंत्री कमलनाथ यांनी पुढाकार घेतला.

महाराष्ट्रात विधान परिषद कधीपासून अस्तित्वात आहे आणि कधी रद्द करण्याचा निर्णय झाला होता का?-

महाराष्ट्रात विधान परिषद १९३७ मध्ये अस्तित्वात आली. मुंबई प्रांत असताना विधान परिषदेची स्थापना झाली होती. २० जुलै १९३७ रोजी राज्य विधान परिषदेची पहिली बैठक ही पुण्यात झाली होती. स्वातंत्र्यपूर्व काळात १९३९ ते १९४६ या काळात विधान परिषद निलंबित अवस्थेत ठेवण्यात आली होती. १९८७ मध्ये  विधान परिषदेचा सुवर्ण महोत्सव साजरा झाला होता. अन्य राज्यांप्रमाणेच महाराष्ट्रातही अधूनमधून विधान परिषद  बरखास्तीची मागणी होत असते. पण महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर विधान परिषद कधी बरखास्त झाली नाही किंवा तसा ठरावही विधानसभेत करण्यात आलेला नाही.

संकलन : संतोष प्रधान