निरपराध मुस्लिम युवकांना ताब्यात घेऊ नका, केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंचा हा निर्देश केऱयाच्या टोपलीत टाकण्याचे आदेश भारतीय जनता पक्षाच्या श्रेष्ठींनी सोमवारी आपल्या मुख्यमंत्र्यांना दिले. देशामध्ये फूट पाडण्याचा कॉंग्रेसचा अजेंडा असल्याचा आरोपही भाजपने केला.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि खासदार व्यंकय्या नायडू म्हणाले, शिंदे हे देशाचे गृहमंत्री आहेत की एका समाजाचे. हा केंद्र सरकारचा बेजबाबदारपणाचा आणि मूर्खपणाचा निर्देश आहे. राज्यघटनेच्या आणि धर्मनिरपेक्षतेच्या तत्त्वाच्याही तो विरोधात असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. शिंदे यांनी कोणत्याही निरपराध व्यक्तीला ताब्यात घेऊ नका, असा निर्देश द्यायला हवा होता. त्यामुळेच मी भाजपचे सरकार असलेल्या मुख्यमंत्र्यांना तो आदेश केराच्या टोपलीत टाकण्याची सूचना केली असल्याचे नायडू म्हणाले.