विविध कारणांसाठी यंदा चर्चेत असलेल्या बिहार विधानसभा निवडणुका शांततेत पार पडाव्यात यासाठी तगडा बंदोबस्त असणार आहे. यासाठी सुरुवातीला केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या ३०० कंपन्या पाठवण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्रालयाने घेतला आहेत. याशिवाय लवकरच ITBP, CISF, CRPF, SSB, RPF and BSF च्या तुकड्याही पाठवण्यात येणार आहेत. तीन टप्प्यात या निवडणुका पार पडणार आहेत.

बिहारच्या २४३ सदस्यीय विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने शुक्रवारी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यानुसार, राज्यात तीन टप्प्यात निवडणूक पार पडणार आहे. पहिल्या टप्प्याचं मतदान २८ ऑक्टोबर, दुसऱ्या टप्प्यातील ३ नोव्हेंबर तर तिसऱ्या टप्प्यातील मतदान ७ नोव्हेंबर रोजी पार पडणार आहे. त्यानंतर १० नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या या पहिल्याच निवडणुकीत संसर्ग टाळण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

सात कोटी मतदार करणार मतदान

२९ नोव्हेंबर रोजी बिहार विधानसभेचा कार्यकाळ संपणार आहे. निवडणुक आयुक्तांनी म्हटलं, यावेळी मतदान केंद्रांची संख्या आणि मनुष्यबळ वाढवण्यात आलं आहे. बिहारमध्ये २०२०च्या निवडणुकीत ७ कोटींहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये महिला मतदारांची संख्या ३ कोटींहून अधिक आहे.

निवडणुकीची चर्चा

बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मूळचा बिहारचा असलेला दिवंगत बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणाने देशभरात बराच खल झाला. सुशांतच्या मृत्यूचा तपास करणाऱ्या मुंबई पोलसांना बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह भाजपाच्या नेत्यांनी टार्गेट केले. त्यात बिहारचे तत्कालीन पोलीस महासंचालक आणि आता आपल्या पदाचा राजीनामा देऊन नितीशकुमार यांच्या राष्ट्रीय जनता दलाच्या तिकीटावर निवडणूक लढवण्याच्या तयारीत असलेले गुप्तेश्वर पांडे यांनी देखील महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सरकारला टार्गेट करीत मुंबई पोलिसांवर आरोप केले होते. एकूणच सुशांतचं मृत्यूप्रकरण बिहारच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तापवण्यात आलं.