काश्मीरमध्ये आपले खबरे आहेत, लष्कराचे साह्य़ आहे, त्यामुळे भारताविरुद्ध लढत असलेल्या काश्मिरींना पाकिस्तानने वाढती चिथावणी दिली पाहिजे, असे प्रतिपादन देशद्रोहाच्या खटल्यात अडकलेले पाकिस्तानचे माजी लष्करशहा जन. परवेझ मुशर्रफ यांनी केले आहे.
एका दूरचित्रवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत ७१ वर्षीय मुशर्रफ म्हणाले की, आमचे सैन्य भारताशी लढण्यास सज्ज आहे आणि पाकिस्तानातील लाखो लोक काश्मीरसाठी लढायला तयार आहेत. पाकिस्तान आपल्याला प्रत्युत्तर देणार नाही, या भ्रमात भारताने राहू नये.
उभय देशांत सीमेवर झालेल्या गोळीबाराबाबत विचारता ते म्हणाले की, काश्मीरमध्ये भारतीय लष्कराशी आम्ही उघड आणि छुपे दोन्ही प्रकारचे युद्ध करू शकतो. आम्ही मुसलमान आहोत, त्यामुळे कोणी एका गालावर थप्पड लगावली तर आम्ही दुसरा गाल पुढे करणार नाही. जशास तसे उत्तर देऊ.
देश जेव्हा कमकुवत असतो तेव्हाच दुसरा देश आपल्यावर चढाई करू शकतो, हे लक्षात घेऊन आम्ही समर्थ असलेच पाहिजे. आम्ही समर्थ असलो तर कोणताही देश आमच्यावर हल्ला करण्याचे धाडस करू शकणार नाही, असेही मुशर्रफ यांनी सांगितले.
नरेंद्र मोदी हे मुस्लीमविरोधी आणि पाकिस्तानविरोधी आहेत. त्यांच्यात कणमात्रही बदल झालेला नाही. चूक आमचीच आहे. त्यांच्या सत्ताग्रहणासाठी आम्हीच धाव घ्यायला आतुर होतो. आम्ही आमची प्रतिष्ठा जपली पाहिजे, असा टोलाही मुशर्रफ यांनी लगावला.