तृणमुल काँग्रेसच्या नेत्यानं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याविषयी बोलताना वादग्रस्त विधान केलं आहे. एका प्रचार सभेत बोलताना नेते कल्याण बॅनर्जी यांची बोलताना जीभ घसरली. त्यानंतर कल्याण यांनी निर्मला सीतारामन यांच्यावर टीका करताना त्यांची काळ्या नागिणीशी तुलना केली. इतकंच नाही, तर काळ्या नागिणीप्रमाणेच निर्मला सीतारामन यांच्यामुळे लोक मरत आहेत," असं विधान त्यांनी केलं. तृणमूलचे नेते कल्याण बॅनर्जी यांची बाकुंरा येथे सभा झाली. यावेळी बोलताना कल्याण बॅनर्जी यांनी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्यावर टीका केली. "ज्याप्रमाणे काळ्या नागिणीनं दंश केल्यानंतर माणसाचा मृत्यू होतो. त्याचप्रमाणे निर्मला सीतारामन यांच्यामुळे लोक मरत आहेत. सीतारामन यांनी अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे. त्यांना लाज वाटायला हवी आणि त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यायला हवा. त्या आतापर्यंतच्या सर्वात वाईट अर्थमंत्री आहेत," अशी टीका कल्याण बॅनर्जी यांनी केली. बाकुंरा येथील सभेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. The way people die due to bite of 'Kala Nagini' (venomous snake),same way,people are dying due to Nirmala Sitharaman. She has destroyed the economy.She should be ashamed&resign from her post.She is the worst Finance Minister: Kalyan Banerjee,TMC in Bankura y'day pic.twitter.com/SnUgdX55m7 — ANI (@ANI) July 5, 2020 कल्याण बॅनर्जी यांनी केलेल्या टीकेचा भाजपानं निषेध केला आहे. भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी यावरून बॅनर्जी यांच्यावर टीका केली आहे. "ज्या राज्यात माँ काळीची प्रत्येक घरात पूजा केली जाते, तिथेच रंगावरून टीका करणं नक्कीच लज्जास्पद आहे. त्यापेक्षी जास्त म्हणजे स्त्रियांविषयी त्यांच्या मनात असलेला द्वेष त्यांच्या बोलण्यातून दिसून येतो, राज्यातून अशी टीका करण्यात आली आहे. निर्मला सीतारामन यांच्याविषयी केलेलं विधान निषेधार्ह आहे," अशी टीका पात्रा यांनी केली आहे.