पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला अगदी थोड्या फरकाने सत्ता कायम राखण्यात यश मिळेल तर तामिळनाडूमध्ये डीएमके-काँग्रेस युती विरुद्ध एआयएडीएमके असा चुरस पहायला मिळेल असा अंदाज टाइम्स नाऊ-सीव्होटर्सच्या ओपिनियन पोलमधून व्यक्त करण्यात आला आहे. केरळमध्ये एलडीएफला पुन्हा एकदा सत्ता मिळेल. तर आसाम आणि पुद्दुचेरीमध्ये पुन्हा एकदा कमळ फुलण्याची चिन्ह दिसत असल्याचं या सर्वेक्षणामधून दिसून आल्याचं म्हटलं आहे. पश्चिम बंगाल, आसाम, केरळ आणि तामिळनाडूबरोबरच पुद्दुचेरीच्या विधानसभा निवडणुकींचं बिगुल वाजलं आहे. याच पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये कोणत्या राज्यात कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय.

पश्चिम बंगाल

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसला सत्ता मिळवण्यात यश आलं तरी त्यांना विजयी जागांच्या संख्येत मोठा फटका बसण्याची चिन्हं दिसत आहेत. भाजपाला यंदा पश्चिम बंगालमध्ये मोठ्या संख्येने मतदान होईल आणि जास्त जागा भाजपाला जिंकता येतील असा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. पश्चिम बंगालच्या विधानसभेमध्ये एकणू २९४ जागा आहेत. त्यापैकी १५४ जागांवर ममतांच्या पक्षाला विजय मिळेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. २०१६ साली मिळालेल्या २११ जागांपेक्षा हा आकडा ५७ ने कमी आहे. भाजपाला २०१६ मध्ये पश्चिम बंगालमध्ये केवळ तीन जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र भाजपाला १०७ जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. त्यामुळे पश्चिम बंगालमध्ये भाजपाची ताकद वाढणार आहे. काँग्रेस आणि डाव्या पक्षांना बंगालमध्ये केवळ ३३ जागा मिळतील असं या सर्वेक्षणामध्ये म्हटलं आहे.

आसाम

आसाममधील निवडणुकीमध्ये १२६ जागांपैकी ६७ जागा भाजपा आणि मित्र पक्षांना मिळतील तर ५७ जागांवर काँग्रेस आणि मित्र पक्षांना यश मिळेल असा अंदाज आहे. २०१६ साली भाजपा आणि मित्र पक्षांना ८६ तर काँग्रेस आणि मित्र पक्षांना केवळ २६ जागांवर विजय मिळवता आलेला.

तामिळनाडू

तामिळनाडूमध्ये डीएमके आणि काँग्रेसच्या युतीची थेट लाढाई एआयएडीएमके आणि भाजपाच्या युतीशी होणार आहे. डीएमके आणि काँग्रेसला २३४ पैकी डीएमकेला १५८ जागा मिळत असं सांगितलं जात आहे. तर एआयएडीएमके आणि भाजपाला ६५ जागांवर विजय मिळेल असा अंदाज या सर्वेक्षणामधून बांधण्यात आलाय.

केरळ

केरळमध्ये मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील एलडीएफला पुन्हा एकदा सत्ता मिळेल असा अंदाज व्यक्त केला जातोय. १४० सदस्यांच्या विधानसभेमध्ये ८२ जागांवर एलडीएफचा विजय होईल असा अंदाज आहे. काँग्रेस आणि युडीएफला केरळमध्ये ५६ जागांवर विजय मिळेल असं या सर्वेेक्षणामधून दिसत आहे. भाजपासाठी केरळमध्ये या निवडणुकीमध्येही अच्छे दिन येण्याची शक्यता या सर्वेक्षणामधून दिसत नाहीय. भाजपाला मागील निवडणुकीप्रमाणे केवळ एका जागेवर समाधान मानावं लागेल असं सांगितलं जात आहे.

पुद्दुचेरी

पुद्दुचेरीमधील विधानसभेच्या ३० जागांपैकी १८ जागांवर भाजपा आणि मित्र पक्षांना यश मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला १२ जागांवर विजय मिळेल असा अंदाज बांधला जातोय.

असं होणार मतदान…

पश्चिम बंगालमध्ये आठ तर आसाममध्ये तीन टप्प्यांमध्ये निवडणूक होणार आहे. आसाम आणि पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान २७ मार्च रोजी होणार आहे. केरळ, तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये एकाच टप्प्यात मतदान होणार असून हे मतदान ६ एप्रिल रोजी पार पडणार आहे. पश्चिम बंगालमधील मतदान हे जवळजवळ एक महिना सुरु राहणार असून आठव्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी होणार आहे. सर्व राज्यांमधील निकाल २ मे रोजी लागणार आहेत. पाचही राज्यांमधील एकूण ८२४ जागांसाठी मतदान होणार आहेत. यामध्ये २.७ लाख मतदानकेंद्रांमध्ये १८ कोटी ६० लाख मतदार आपला मतदानाचा हक्क बजवतील. यापैकी पश्चिम बंगालमध्येच एक लाखांहून अधिक मतदान केंद्र आहेत. या सर्व राज्यांपैकी बंगालची सर्वाधिक चर्चा आहे. बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसचा भाजपाने थेट आव्हान दिलं असून राज्यात सत्ता मिळवण्याचा भाजपाने सर्व जोर लावण्याची तयारी केलीय. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत: बंगालमधील निवडणुकीमध्ये प्रचारासाठी उतरल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्याचबरोबर केंद्रीय मंत्रीमंडळातील अनेक नेत्यांसहीत भाजपाने येथे सारा जोर लावलाय. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी एकट्या तृणमूलसाठी प्रचार करत आहेत.