आरोग्यास घातक असलेले हवा प्रदूषण रोखण्यासाठी देशभरात होणारी कोळशाची वाहतूक झाकलेल्या ट्रक किंवा बंद रेल्वे वॅगनमधून करण्याचा सरकारचा विचार असल्याचे कोळसा आणि रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी पीटीआयशी बोलताना सांगितले. कोळशाच्या खाणींमधून कोळसा बाहेर काढल्यानंतर त्याची वाहतूक करताना ती उघड्या वाहनांमधून किंवा रेल्वेच्या उघड्या मालगाड्यांमधून करणे पर्य़ावरणासाठी जास्त घातक असून त्यामुळे मोठ्याप्रमाणावर हवा प्रदूषणात भर पडत असल्याचे निरीक्षण पर्यावरण विषयक संस्थांनी नोंदवले आहे. त्याचबरोबर बंदरांमधून वाहतूक करताना तसेच वीज निर्मिती प्रकल्पांमध्ये कोळसा वापरताना निर्माण होणारी राख आणि धूळ यांमुळे हवा प्रदूषणात भर पडत असते. गोयल म्हणाले, कोळशाच्या पर्यावरणपूरक वाहतुकीसाठी चांगला पर्याय आम्ही शोधत आहोत. त्यासाठी कोळसा वाहतूक करणारे सर्व ट्रक आणि रेल्वे वॅगन हे झाकलेले असावेत अशी त्यांची रचना करण्याचे आदेश संबंधीत विभागाला देण्यात आले आहेत. सध्या नोव्हेंबर महिन्यांत सलग तिसऱ्या वर्षी राजधानी दिल्लीत मोठ्या प्रमाणात विषारी धुरके पसरले होते. याला हेल्थ इमर्जन्सी म्हणून संबोधण्यात आले होते. वीज निर्मिती प्रकल्पांतील कोळसा जाळण्याच्या प्रक्रियेतून अशा प्रकारे कार्बनडाय ऑक्साईड बाहेर पडून मोठ्या प्रमाणावर हवा प्रदूषण होते. भारतात ६५ टक्के वीज ही औष्णिक प्रकल्पांतून तयार होते. त्यासाठी कोळसा इंधन म्हणून वापरला जातो. देशात कोळशाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते. त्यामुळे इतर नैसर्गिक गॅस आणि द्रव हायड्रोकार्बन्सच्या पर्यायापेक्षा हा सर्वात स्वस्त पर्याय आहे. गोयल म्हणाले, कोळशावर आधारित वीज निर्मिती प्रकल्पांतील प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करीत आहे. त्यासाठीच गेल्या आठवड्यात सरकारने खास कोळशाच्या वाहतुकीसाठी झाकलेले ट्रक आणि रेल्वे वॅगन तयार करण्याचे आदेश दिले आहेत. केंद्र सरकार पर्यावरण बदलावर मात करण्यासाठी अनेक अभियान राबवत असल्याचेही गोयल यांनी सांगितले. त्यासाठी एलईडी बल्ब आणि ट्यूब्सचा वापर वाढवण्यावर भर देण्यात आला आहे.