नागरिकत्व सुधारणा विधेयकाचे कायद्यात रुपांतर झाल्यानंतर काँग्रेसने आता मोदी सरकारविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यानुसार, दिल्लीत आज रामलीला मैदानावर काँग्रेसकडून ‘भारत बचाव रॅली’चे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, यावेळी राहुल गांधी यांनी पुन्हा काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सुत्रे स्विकारावीत अशी विनंती काँग्रेस नेते आणि कार्यकर्त्यांकडून करण्यात येणार असल्याचे सुत्रांकडून कळते.

काँग्रेस अध्यक्ष म्हणून सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेली ही मोठी रॅली आहे. या रॅलीपूर्वी ज्याप्रकारे भाजपाने संसदेत राहुल गांधी यांना घेरण्याचा प्रयत्न केलो होता. त्यामुळे आज या रॅलीद्वारे काँग्रेस नेत्यांबरोबरच राहुल गांधी यांचाही आक्रमक पवित्रा पहायला मिळू शकतो.

काँग्रेस या रॅलीमध्ये आर्थिक मंदी, बेरोजगारी, महिला सुरक्षा आणि शेतकऱ्यांच्या मुद्यांवरुन मोदी सरकारला घेरणार आहे. नागरिकत्व कायद्यावरुन ईशान्य भारतात उसळलेल्या हिंसाचाराच्या मुद्द्याबरोबरच पश्चिम बंगाल आणि केरळमध्ये हा कायदा लागू न करण्याचा तिथल्या राज्य सरकारांनी घेतला आहे. हे मुद्देही यावेळी काँग्रेसच्या अजेंड्यावर असणार आहेत.

परदेशात भारतीय दुतावासांसमोर होणार आंदोलन

बेरोजगारी, बिकट अर्थव्यवस्था आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवरुन इंडियन ओव्हरसीज काँग्रेसने (आयओसी) शनिवारी जगभरातील भारतीय दुतावास आणि उच्चायोगाबाहेर निदर्शने करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था वाईट स्थितीत पोहोचली आहे. “परदेशात स्थायिक असलेले भारतीय वंशाचे लोक या सर्व मुद्द्यांवरुन भारतीय दुतावासाबाहेर निदर्शने करणार आहेत,” असे आयओसीचे सचिव विरेंद्र वशिष्ठ यांनी म्हटले आहे. अमेरिका, ब्रिटन, ऑस्ट्रेलिया, न्यूझिलंड, जर्मनी, सौदी अरेबिया, ओमान येथील भारतीय दुतावासांच्या बाहेर होणाऱ्या या आंदोलनांचे निरिक्षण आयओसीचे अध्यक्ष सॅम पित्रोडा करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.