लोकसभेनंतर आज राज्यसभेत तिहेरी तलाक विधेयक मंजूर झाले. आता यावर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरी होताच त्याचे कायद्यात रूपांतर होईल. दरम्यान हे विधेयक राज्यसभेत मंजूर होताच पंतप्रधान मोदींनी ट्विटद्वारे प्रतिक्रिया देत विधेयकास पाठिंबा दिलेल्या राज्यसभेतील सर्व खासदारांचे आभार व्यक्त केले. तसेच त्यांनी म्हटले की, त्यांचे हे पाऊल भारताच्या इतिहासात सदैव स्मरणात ठेवले जाईल. शिवाय, आजचा दिवस ऐतिहासीक असल्याचेही ते म्हणाले.

मोदींनी म्हटले आहे की, आज एक ऐतिहासीक दिवस आहे. आज कोट्यवधी मुस्लीम माता-भगिनींचा विजय झाला आहे. त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळाला आहे.  या ऐतिहासीक क्षणी मी सर्व खासदारांचे आभार व्यक्त करतो.

तिहेरी तलाक विधेयक मंजूर होणे हे महिला सशक्तीकरणाच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. तुष्टिकरणाच्या नावाखाली देशातील कोट्यावधी मात-भगिनींना त्यांच्या अधिकारापासून वंचित ठेवण्याचे पाप केले गेले आहे. मला या गोष्टीचा अभिमान आहे की मुस्लीम महिलांना त्यांचा अधिकार मिळवून देण्याचा मान आमच्या सरकारला मिळाला.

राज्यसभेत मंगळवारी तिहेरी तलाक विधेयक ९९ विरूद्ध ८४ च्या फरकाने मंजूर झाले. तिहारी तलाक विधेयकावर राज्यसभेत प्रदीर्घ चर्चा करण्यात आली. भाजपाने या विधेयकाचे समर्थन करत हे विधेयक म्हणजे महिलांच्या सन्मानासाठी तयार करण्यात आलेले विधेयक असल्याचे म्हटले.