देशातील राष्ट्रीय महामार्गांवर २४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत टोलमाफीच्या घोषणेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राज्य महामार्गावर टोलमाफीला मुदतवाढ दिली आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी ट्विटरद्वारे ही घोषणा केली आहे. राज्यातील सर्व राज्य महामार्गावर २४ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत टोलमाफी करण्यात आली आहे.
तत्पूर्वी केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्गावरील टोलमाफीची घोषणा केली होती. ५०० आणि १००० रुपयांच्या नोटा बंद झाल्यानंतर टोलनाक्यांवर कर्मचारी आणि वाहनचालकांमध्ये वाद निर्माण होऊ नयेत, यासाठी यापूर्वी ११ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत टोलमाफी करण्यात आली होती. त्यानंतर १४ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. परंतु चलन समस्या सुटत नसल्यामुळे पुन्हा १८ नोव्हेंबरपर्यंत मुदत वाढवली होती. त्यात बदल करत आता पुन्हा २४ नोव्हेंबरपर्यंत टोलमाफीचा कालावधी वाढवला आहे.

केंद्र सरकारला गत आठ दिवसांत तिसऱ्यांदा टोलमाफीला मुदतवाढ देण्याचा निर्णय घ्यावा लागला. देशातील चलन तुटवड्यावर परिणामकारक मार्ग काढता न आल्यामुळे अजूनही गोंधळ सुरूच आहे. अजूनही या समस्येवर संपूर्णपणे नियंत्रण मिळवण्यात केंद्राला यश आलेले नाही. त्यामुळे केंद्राने पुन्हा एकदा टोलमाफीला मुदतवाढ दिली आहे.