लिचीची फळे सेवन केल्यामुळे येथील काही मुलांचा मेंदूच्या गूढ रोगाने मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. गेल्या काही वर्षांत बिहारमध्ये काही मुलांचा मृत्यू झाला असून, त्याचे गूढ उकलले नव्हते. त्याबाबत एक संशोधन निबंध लॅन्सेट जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. त्यात हे मृत्यू लिचीच्या सेवनाने झाले असल्याचा संशय व्यक्त केला आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्हय़ात मुले दरवर्षी मोठय़ा प्रमाणावर मेंदूच्या आजाराने मृत्युमुखी पडत आहेत. तेथे लिचीच्या फळाची लागवड मोठय़ा प्रमाणावर होते. उष्णता, आद्र्रता, कुपोषण, मान्सून व कीडनाशके ही त्याची कारणे असल्याचे सांगितले जात होते. संशोधकांनी सांगितले, की हा आजार कशामुळे होतो हे शोधण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल ही नवी दिल्लीची संस्था तसेच अमेरिकेतील सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शन यांनी रुग्णालयात पाहणी करून नंतर प्रयोगशाळेतही संशोधन केले आहे. या रोगाची संसर्गजन्य व असंसर्गजन्य कारणे शोधण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. मुझफ्फरपूर येथे दोन रुग्णालयांत २०१४ मध्ये पंधरा वर्षांवरील मुलांना दाखल केले होते व त्यांना मेंदूचा आजार होता. त्याच वयाची पण हा रोग न झालेली मुलेही इतर रुग्णालयात होती. त्यांच्यावर सात दिवस लक्ष ठेवण्यात आले. त्यांचे रक्ताचे नमुने, सेरेब्रोस्पायनल फ्लुईड व मूत्र यांची चाचणी करण्यात आली. लिचीच्या फळात काही संसर्गजन्य जंतू किंवा विषारी धातू आहेत की नाही याची तपासणी करण्यात आली, त्यात असंसर्गजन्य कारणेही शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. हायपोग्लायसिन ए किंवा मेथिलीने सायक्लो प्रोपायली ग्लिसरीन हे फळातील विष तपासण्यात आले, त्यामुळे हायपोग्लायसिमिया होऊन चयापचयाची क्रियाही बिघडते. मे २६ ते जून १७ २०१४ दरम्यान ३९० जणांना मुझफ्फरपूरच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यातील १२२ जण मरण पावले. ३२७ पैकी २०४ जणांमध्ये रक्तात ग्लुकोजचे प्रमाण डेसिलीटरला ७० मिलीग्रॅम होते. लिचीचे फळ खाणे व नंतर २४ तास सायंकाळी जेवण न करणे यामुळे मेंदूचा आजार होतो असे समजते. लिची फळ खाऊन रात्री जेवले नाहीतर त्याचे खूप वाईट परिणाम होतात. या रुग्णांच्या लघवीत हायपोग्लायसिन ए व एमसीपीजी हे मेटॅबोलाइट ४८ टक्के दिसून आले. या दोन घटकांशी एन्सेफॅलोपॅथी या मुझफ्फरपूरमधील रोगाचा संबंध आहे असे संशोधकांचे मत आहे. लिचीचे सेवन कमी करणे, सायंकाळचे जेवण न टाळणे, नेहमी ग्लुकोजची तपासणी करणे हे उपाय त्यांनी सुचवले आहे.