गेल्या काही काळात मोबाईलधारकांना सातत्याने सामोरे जावे लागणाऱ्या कॉल ड्रॉपच्या समस्येवर लवकरच तोडगा निघण्याची शक्यता आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय) यासंबंधीचा एक प्रस्ताव मांडला असून यामध्ये ग्राहकांना त्यांचा कॉल ड्रॉप झाल्यास नुकसान भरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे.  ग्राहकांकडून संबंधित कॉलचे मुल्य न आकारणे किंवा मोफत कॉलिंग मिनिटस देणे असे या नुकसान भरपाईचे स्वरूप असू शकते. ‘ट्राय’ने यासंदर्भात एक सल्लापत्रक जारी केले असून त्यावर २८ सप्टेंबरपर्यंत लोकांकडून सूचना मागविण्यात येणार आहेत. कॉल सुरू झाल्यापासून पाच सेकंदांच्या आत ड्रॉप झाल्यास त्यासाठी भरपाई देऊ नये. मात्र, पाच सेकंदांनंतर कॉल ड्रॉप झाल्यास त्यासाठी भरपाई द्यावी. ही भरपाई देताना शेवटची पल्स गृहीत धरण्यात येऊ नये, असे पत्रकात म्हटले आहे.  गेल्या काही काळात कॉल ड्रॉपची वाढती समस्या पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील ‘ट्राय’ला या प्रकरणाची दखल घेण्यास सांगितले होते.