करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. अशा संकटकाळात हाती रोजगार नसल्यानं श्रमिकांनी पायी आपल्या गावची वाट धरली होती. परंतु रेल्वे मंत्रालयानं त्यांना आपापल्या निर्धारित ठिकाणांपर्यंत पोहोचवण्यासाठी श्रमिक रेल्वेची सुरूवात केली आहे. गुरूवारी महाराष्ट्रातील वसई रोड स्थानकावरून उत्तर प्रदेशमधील गोरखपुर या ठिकाणी जाण्यासाठी श्रमिक रेल्वे निघाली होती. परंतु ती रेल्वे उत्तर प्रदेशात पोहोचण्याऐवजी ७५० किलोमीटर दूर ओडिशामध्ये पोहोचली. दरम्यान यामुळे प्रवाशांना आश्चर्याचा धक्काच बसला. तसंच काही लोकांनी याबाबत विचारणाही केली. तसंच रेल्वे आपला मार्ग सोडून दुसरीकडे गेली अशा चर्चांनाही उधाण आलं होतं. परंतु त्यावर आता रेल्वे प्रशासनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. ही रेल्वे आपला मार्ग सोडून अन्य ठिकाणी गेली नसल्याचं रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आलं. 1. Vasai Rd-Gorakhpur Shramik Special wch departed on 21 May,2020 was to run on Kalyan Bhusaval-Itarsi-Jabalpur - Manikpur route but this train will go to Gorakhpur by diverted route ie via Bilaspur, Jharsuguda,Rourkela,Asansol due to heavy traffic congestion on existing routes — Western Railway (@WesternRly) May 23, 2020 २१ मे रोजी महाराष्ट्रातील वसई रोड या स्थानकावरून सुटलेली वसई गोरखपुर ही ट्रेन कल्याण-भुसावळ-इटारसी-जबलपूर-माणिकपूर या मार्गांवरूनच धावणार होती. परंतु या ट्रेनचा मार्ग बदलण्यात आला असून ती बिलासपूर, रसुगुडा, राउरकेला, आसनसोल या मार्गांवरून गोरखपुरला जाईल. विद्यमान मार्गावर कंजेशन असल्यानं या ट्रेनचा मार्ग वळवण्यात आला आहे, असं स्पष्टीकरण पश्चिम रेल्वेकडून देण्यात आलं आहे.