वादग्रस्त राजकीय मुद्दे आणि घोटाळे यांचा कुठलाही परिणाम न होता तृणमूल काँग्रेसने पश्चिम बंगालमधील लोकसभा आणि विधानसभा पोटनिवडणुकीत भरघोस मताधिक्याने विजय मिळवला आहे. तृणमूल काँग्रेसच्या ममताबाला ठाकूर यांनी बोंगाव (राखीव) लोकसभा मतदारसंघात माकप उमेदवार देबेश दास यांचा २ लाख ११ हजार मताधिक्याने पराभव केला. किशनगंज विधानसभा पोटनिवडणूक तृणमूलचे सत्यजित बिस्वास यांनी ३७ हजार मताधिक्याने जिंकली. त्यांनी भाजपचे उमेदवार मानवेंद्र रॉय यांना हरवले.  सीबीआयने तृणमूल काँग्रेसच्या अनेक नेत्यांना शारदा घोटाळ्यात केलेली अटक व पक्षात फूट पडण्याची कुजबुज यामुळे  ही निवडणूक ममता बॅनर्जी सरकारची परीक्षा मानली जात होती.