लोकसभा निवडणुकीनंतर तृणमूल काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या नेत्यांवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी जोरदार हल्ला चढविला आहे. पक्ष सोडणारे लोभी आणि भ्रष्ट असून भाजप कचरा गोळा करीत आहे, असे बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

पक्ष सोडून गेलेले देशद्रोही आहेत. त्यांच्याऐवजी आपण समर्पित कार्यकर्त्यांना स्थान देणार आहोत, ज्यांनी अद्याप भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलेला नाही, त्यांनी लवकरात लवकर पक्ष सोडावा, असेही ममता बॅनर्जी यांनी म्हटले आहे.

तृणमूलचे तीन आमदार आणि राज्यातील पाच महापालिकांमधील बहुसंख्य नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याच्या पार्श्वभूमीवर ममतांनी वरील मत व्यक्त केले आहे. पक्ष सोडून जाणाऱ्या लोभी आणि भ्रष्ट नेत्यांचे आम्हाला सोयरसुतक नाही, आपण जे कृत्य केले आहे त्याबद्दल कारवाई होईल, या भीतीने त्यांनी पक्ष सोडला आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाल्या.

पक्षातील कचरा आम्ही बाहेर फेकला आहे आणि भाजप तो गोळा करीत आहे, मात्र कोणत्याही पक्षात प्रवेश केला तरी भ्रष्टाचाराच्या चौकशीतून कोणाचीही सुटका नाही, असेही बॅनर्जी यांनी पक्षाच्या नगरसेवकांच्या बैठकीत सांगितले.