तिहेरी तलाकच्या मुद्द्यावरून देशातील वातावरण तापले आहे. हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचला आहे. त्याच्यावर काही दिवसांत निर्णय येईलच. पण त्यापूर्वी तिहेरी तलाक तसेच इतर धर्मियांतील घटस्फोटाची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. किती मुस्लिम महिलांना तिहेरी तलाक दिला जातो, याची अधिकृत आकडेवारी उपलब्ध नाही. मात्र देशातील विविध जाती-धर्मांमधील घटस्फोटाच्या प्रमाणापेक्षा तिहेरी तलाकचे प्रमाण अधिक नाही, अशी माहिती समोर आली आहे. सर्वोच्च न्यायालयात येत्या ११ मेपासून तिहेरी तलाकसंदर्भातील याचिकांवरील सुनावण्या घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर ही माहिती देण्यात आली आहे. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार भारतात १३.२ लाख घटस्फोटीत आहेत. मात्र सामाजिक कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, ही नोंद कमी आहे. यातील ९.०९ लाख महिला घटस्फोटीत असून त्यांचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या ६८ टक्के आहे. भारतात १ हजार लग्नांपैकी सरासरी २.३ जोडपी घटस्फोट घेतात. पुरुषांमध्ये हा दर १.५८ असून महिलांमध्ये तो ३.१० इतका आहे. या निष्कर्षावरुन असे दिसते की पुरुष घटस्फोट झाल्यानंतर पुन्हा लवकर लग्न करतात. मुस्लिम महिलांमध्ये पुरुषांपेक्षा तिहेरी तलाकचे प्रमाण जास्त आहे. इतर समाजाच्या महिलांच्या बाबतीत पूर्ण असमानता आहे. बौद्ध धर्मातील पुरुषांमध्ये १ हजार लग्नांमागे घटस्फोटाचे प्रमाणात सरासरी तीन इतके आहे. तर ख्रिश्चन पुरुषांमध्ये हे प्रमाण २.९२ इतके आहे. तर मुस्लिम पुरुषांमध्ये १.५९ म्हणजेच मुस्लिम महिलांपेक्षा तीनपटीने कमी आहे. यावरुन असे दिसून येते की मुस्लिम पुरुष जास्त काळ एकटे राहत नाहीत आणि ते लवकर दुसरे लग्न करतात. त्यामुळे एकीकडे तिहेरी तलाकवरुन वादंग सुरू असला तरी, प्रत्यक्ष आकडेवारीवरुन एक वेगळेच वास्तव समोर आले आहे, असे मानले जाते.