पुण्यातील येरवडा येथील लक्ष्मीनगर भागात महानगरपालिकेच्या शाळेच्या पाण्याच्या टाकीत पडून दोन मुलांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, येरवडयातील लक्ष्मीनगर भागातल्या महापालिका शाळेच्या परिसरात ही दुर्घटना घडली आहे. दुपाराच्या सुमारास रुद्र चव्हाण आणि रुद्र भुजबळ हे दोघे खेळण्यासाठी शाळेच्या परिसरात गेले होते. खेळताना ते पाण्याच्या टाकीजवळ गेले आणि चुकून टाकीत पडले. टाकी पाण्याने भरलेली असल्याने आणि या मुलांना पोहता येत नसल्याने पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान, शाळेच्या परिसरात कमी उंचीवर असणाऱ्या या पाण्याच्या टाकीभोवती योग्य सुरक्षा व्यवस्था न केल्यानेच या दोन मुलांना आपला जीव गमवावा लागल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. मात्र, पोलिसांच्या तपासानंतरच यामागील खरे कारण कळू शकणार आहे.