काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी रेप इन इंडिया या वक्तव्यावरुन मी माफी मागणार नाही. माझं नाव राहुल गांधी आहे राहुल सावरकर नाही असे वक्तव्य करुन नव्या वादाला तोंड फोडले आहे. राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावरुन शिवसेनाही आक्रमक झाली आहे. तर दुसरीकडे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू आणि स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजीत सावरकर यांनीही तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. ” मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीररित्या राहुल गांधी यांना जोडे मारावेत” असं रणजीत सावरकर यांनी म्हटलं आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू रणजीत सावरकर म्हणाले की, ” स्वातंत्र्यवीर सावरकर हे महाराष्ट्राचेच नाहीत तर संपूर्ण देशाचे दैवत आहेत. मी राहुल सावरकर नाही, राहुल गांधी आहे, जीव गेला तरीही माफी मागणार नाही असं राहुल गांधी म्हणाले. ही चांगलीच गोष्ट आहे की राहुल गांधी यांचे आडनाव सावरकर नाही. त्यांचे आडनाव सावरकर असते तर आम्हाला तोंड काळे करावे लागले असते”

“वीर सावरकर यांनी ब्रिटिशांची कधीही माफी मागितली नाही. त्यामुळे राहुल गांधी यांना जे सुचवायचं आहे त्यामध्ये काहीही तथ्य नाही. पंडित नेहरु यांनी १९४६ मध्ये व्हॉईसरॉय कौन्सिलमध्ये मंत्रिपद मिळावं म्हणून म्हणजेच सत्तेच्या मोहापायी ब्रिटिशांची आणि जॉर्ज सहा यांच्याशी एकनिष्ठ राहण्याची शपथ घेतली होती हे रेकॉर्डवर आहे. पंडित नेहरु यांनी ही शपथ इतक्या निष्ठेने निभावली की देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही म्हणजेच १९५० पर्यंत किंग जॉर्जला पंडित नेहरु हे भारताचा सम्राट मानत होते. भारतातील प्रत्येक निर्णयासाठी त्यांची परवानगी पंडित नेहरु घेत असत. अशी गुलामगिरीची मानसिकता असलेल्या पंडित नेहरुंच्या पणतूकडून वीर सावरकर यांचा अपमान होणं हे नैसर्गिक आहे. त्यांच्या रक्तातच परदेशातली गुलामगिरी भिनली आहे.”  असंही रणजीत सावरकर यांनी म्हटलं आहे.