संयुक्त राष्ट्राकडून पाकिस्तानला पुन्हा झटका मिळाला आहे. काश्मीर प्रश्नी आंतरराष्ट्रीय समुदायाने हस्तक्षेप करावी ही पाकिस्तानची मागणी आहे. पण संयुक्त राष्ट्राने पाकिस्तानला भारताबरोबर चर्चा करण्याचा सल्ला दिला आहे. एकप्रकारे अप्रत्यक्षपणे पाकची मागणी फेटाळून लावली आहे.

संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनिओ ग्युटेरेस यांना काश्मीरवरुन भारत-पाकिस्तानमध्ये असलेल्या तणावाची चिंता आहे. हा तणाव आणखी वाढू शकतो अशी त्यांना भिती आहे. त्यांनी दोन्ही देशांना चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन केल्याचे ग्युटेरेस यांच्या प्रवक्त्याने सांगितले. मागच्या महिन्यात फ्रान्समध्ये जी ७ परिषदेच्या निमित्ताने अँटोनिओ ग्युटेरेस यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर चर्चा केली होती. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरेशी यांच्यासोबत सुद्धा त्यांचे बोलणे झाले आहे अशी माहिती संयुक्त राष्ट्राचे मुख्य प्रवक्ते स्टीफेन दुजारिक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

पाकिस्तानच्या संयुक्त राष्ट्रातील कायमस्वरुपी सदस्य मलीहा लोधी यांनी केलेल्या विनंतीवरुन ग्युटेरेस यांनी त्यांची भेट घेतली. काश्मीरमधल्या परिस्थितीवरुन भारत-पाकिस्तानमध्ये तणाव वाढेल याची त्यांना भिती आहे. त्यांनी दोन्ही बाजूंना चर्चेतून मार्ग काढण्याचे आवाहन केले आहे. सर्वांसाठी त्यांचा सारखाच संदेश आहे असे ग्युटेरेस यांच्यावतीने स्टीफेन दुजारिक यांनी सांगितले. या महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत ग्युटेरेस काश्मीर मुद्दावरुन भारत-पाकिस्तानमध्ये मध्यस्थी करणार का? हा प्रश्न दुजारीक यांना विचारण्यात आला.

त्यावर त्यांनी तुम्हाला आमची भूमिका माहित आहे. आमच्यासाठी हा तत्वांचा विषय आहे आणि कायमच तो तसाच राहिल असे उत्तर स्टीफेन दुजारिक यांनी दिले. संयुक्त राष्ट्राच्या महसभेला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इम्रान खान दोघेही उपस्थित राहणार आहेत. कालच संयुक्त राष्टाच्या मानवधिकार परिषदेत भारताने काश्मीर हा भारताचा अंतर्गत विषय असून तिसऱ्या देशाचा हस्तक्षेप मंजूर नसल्याचे स्पष्ट केले. पाकिस्तानला काश्मीर आंतरराष्ट्रीय मुद्दा बनवून यामध्ये हस्तक्षेप घडवून आणायचा आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प तशी वारंवार तयारी दाखवत आहेत. पण ट्रम्प यांच्यासमोरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काश्मीर भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचे स्पष्ट केले आहे.

भारताचे पाकिस्तानला सणसणीत उत्तर
संयुक्त राष्ट्रात जम्मू-काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या पाकिस्तानला भारताने सणसणीत प्रत्युत्तर दिले आहे. भारताने पाकिस्तानचे सर्व आरोप खोडून काढले आहेत. पाकिस्तान खोटेनाटे आरोप करत असून भारताने काश्मीरबद्दल संविधानाच्या चौकटीत राहून कायदेशी पाऊल उचलले आहे असे विजय ठाकूर सिंह यांनी संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेत सांगितले.

सामाजिक आर्थिक समानता आणि न्याय मिळवून देण्यासाठी माझे सरकार प्रगतीशील धोरणात्मक निर्णय घेत आहे असे विजय ठाकूर सिंह म्हणाल्या. भारत आपल्या अंतर्गत विषयांमध्ये कोणाचाही हस्तक्षेप सहन करणार नाही हे भारताने स्पष्ट केले. पाकिस्तान खोटे आरोप करत असून प्रदेशातील जनतेच्या मानवी हक्काच्या संरक्षणासाठी भारत कटिबद्ध आहे असे परराष्ट्र मंत्रालयाच्या सचिव विजय ठाकूर सिंह यांनी संयुक्त राष्ट्रात सांगितले.