हिमाचल प्रदेशमधील राजकारण सध्या पंचायत निवडणुकामुळे चांगलेच तापले आहे. मात्र त्याचवेळी अनेक ठिकाणी मतदारयादीमध्ये गोंधळ असल्याचे चित्र दिसत आहे. अनेकांची नावं मतदारयादीमधून गायब आहेत तर काही ठिकाणी अगदीच उलट चित्र दिसत आहे. ऊना जिल्ह्यातील हरोली विधानसभा मतदारसंघातील एकमेव नगरपंचायत असणाऱ्या टाहलीवालमध्येही असाच एक विचित्र घोळ समोर आला आहे. काँग्रेसचे स्थानिक आमदार मुकेश अग्निहोत्री यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त करत मतदारयादीच्या विश्वासर्हतेसंदर्भात प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. त्यांनी नगर पंचायतींच्या निवडणुकीसंदर्भात एक पोस्ट सोशल नेटवर्किंगवर शेअर केली आहे. निवडणुकींमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप अग्निहोत्री यांनी केला आहे.

अग्निहोत्री यांनी फेसबुकवर मतदारयादीचा फोटो शेअऱ करत एकाच घराच्या पत्त्यावर १०२ मतदारांची ओळखपत्र बनवण्यात आल्याचा आरोप केला आहे. टाहलीवाल येथील नगर पंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जारी करण्यात आलेल्या या मतदार ओळखपत्रांमध्ये एकाच घराच्या पत्त्यावर दाखवण्यात आलेल्या मतदारांपैकी अनेकजण हे प्रवासी आहेत. अग्निहोत्री यांनीच याच कारणामुळे मतदारयादीमध्ये मोठा घोळ अशल्याचा आरोप केला आहे. स्थानिक प्रशासनाने यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया अद्याप दिलेली नाही.

हरोलीचे उपविभागीय दंडाधिकारी असणाऱ्या गौरव चौधरी यांनी आपल्याला या गोंधळासंदर्भात काहीच कल्पना नसल्याचे म्हटले आहे. कोणी तक्रार केल्यास यासंदर्भात कारवाई केली जाईल असंही चौधरी यांनी स्पष्ट केलं आहे. हिमाचलमधील पंचायत निवडणुकांसाठी तयार करण्यात आलेल्या मतदारयाद्यांमध्ये अशाप्रकारे घोळ समोर येण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. चंबासहीत अनेक जिल्ह्यांमध्ये वर्षानुवर्षे मतदान करणाऱ्या स्थानिकांची नावं मतदारयादीमधून गायब असल्याची माहिती समोर आळी आहे. एका ठिकाणी तर नगर पंचायत प्रमुख राहिलेल्या व्यक्तीचं नावच मतदारयादीमध्ये नसल्याचं स्पष्ट झालं आहे. काँग्रेस सरकारच्या कालावधीमध्ये मंत्रीपद भूषवणाऱ्या सुधीर शर्मा यांचं नावही मतदारयादीमधून गायब असल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.