आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी पुन्हा एकदा प्रसिद्धीमाध्यमांना आपल्या टीकेचे लक्ष्य केले. नरेंद्र मोदींच्या गुजरातमधील खरी परिस्थिती प्रकाशझोतात आणण्याचे धाडस प्रसारमाध्यमांकडे आहे का असा सवाल केजरीवाल यांनी उपस्थित केला. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविषयी सत्य माहिती प्रसिद्धीमाध्यमांकडून देण्यात येत नसल्याचा आरोप केजरीवाल यांनी बंगळुरूमध्ये पत्रकारांशी बोलताना केला. यापूर्वीसुद्धा केजरीवालांनी आपले सरकार आले तर माध्यमांच्या प्रतिनिधींना कारागृहात टाकू असे विधान केले होते. मात्र, त्यानंतर सारवासारव करत अरविंद केजरीवाल यांनी आपण असे विधान केलेच नसल्याचा दावा केला होता.