केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा पहिला अर्थसंकल्प सादर करण्यास सुरूवात केली आहे. निर्मला सीतारामन यांच्या निमित्ताने प्रथमच महिला अर्थमंत्री अर्थसंकल्प सादर करत आहेत. यावेळी बोलताना निर्मला सीतारामन यांनी एक ट्रिलयन डॉलर अर्थव्यवस्था होण्यास ५५ वर्ष लागली, पण आम्ही फक्त पाच वर्षात एक ट्रिलियन डॉलर्स त्यात जोडले असं सांगितलं.

यावेळी निर्मला सीतारामन यांनी पाच ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं उद्दिष्ट पुढच्या काही वर्षांमध्ये नक्की गाठू असा विश्वास व्यक्त केला. तसंच या वर्षातच तीन ट्रिलियन डॉलरचं लक्ष आपली अर्थव्यवस्था गाठेल असंही सांगितलं. पाच वर्षांपुर्वी भारतीय अर्थव्यवस्था ११ व्या क्रमांकावर होती. पण आता भारत जगातील सहावी मोठी अर्थव्यवस्था झाली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.

अर्थसंकल्प मांडण्यास सुरुवात करताना जनतेने आम्हाला पूर्ण बहुमत दिलं. भारताच्या प्रगतीचा अर्थसंकल्प आहे. नव्या भारताचा हा अर्थसंकल्प आहे असं निर्मला सीतारामन यांनी म्हटलं. स्थिर आणि प्रगतीशील भारतासाठी हा अर्थसंकल्प असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलं. लोकांनी दिलेल्या जनमताच्या आधारे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात आम्ही आमचं ध्येय गाठणार असा निर्धार यावेळी त्यांनी व्यक्त केली.

गेल्या पाच वर्षात नव्या भारतासाठी आम्ही काम केलं, देशातील सर्वात शेवटच्या लोकांपर्यंत आम्ही पोहोचलो. भारतातील सर्व खासगी उद्योगांनी अर्थव्यवस्थेला वाढवण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडली. आमचं सरकार परफॉर्म, रिफॉर्म आणि ट्रान्सफॉर्म या सूत्राने काम करत आहे. आता नव्या भारताचं स्वप्न सत्यात उतरेल असं निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.