अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी भारतामधील माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असणाऱ्या ‘इन्फोसिस’ विरुद्ध ‘पांचजन्य’ वादात उडी घेतली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक मुखपत्र असणाऱ्या ‘पांचजन्य’ची बाजू न घेता निर्मला सीतारमन यांनी इन्फोसिसची बाजू घेत एवढ्या मोठ्या कंपनीला देशद्रोही म्हणणं चुकीचं होतं असं थेट मत व्यक्त केलं आहे. पांचजन्यमध्ये इन्फोसिस संदर्भात छापून आलेल्या वादग्रस्त लेखासंदर्भात निर्मला यांनी हे मत व्यक्त केलंय. वस्तू व सेवाकर (जीएसटी) आणि प्राप्ती कर पोर्टलमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींच्या अनुषंगाने टीका करताना पांचजन्यमधून हे गंभीर आरोप करण्यात आले होते.

निर्मला यांनी सीएनएन-न्यूज १८ शी बोलताना, “ते वक्तव्य योग्य नव्हतं. अशाप्रकारचं वक्तव्य करण्याची काहीच गरज नव्हती. हे चांगलंच झालं की त्यांनी (राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने) या वक्तव्याशी आपला काही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. ते वक्तव्य फारच चुकीचं होतं,” असं मत व्यक्त केलं आहे. तसेच पुढे बोलताना निर्मला यांनी स्वत: इन्फोसिसबरोबर प्रत्यक्षात या नवीन पोर्टलसंदर्भात काम करत होत्या. त्यांनी सरकार आणि इन्फोसिस एकत्र काम करत असल्याची माहिती दिली. मी स्वत: दोन वेळा त्यांना फोन केला आणि नंदन निलेकणी (‘इन्फोसिस’च्या प्रवर्तकांपैकी एक) यांचं या समस्येकडे लक्ष वेधलेलं, असं निर्मला म्हणाल्या.

मला विश्वास आहे की…

“मला विश्वास आहे की इन्फोसिस त्यांनी दिलेल्या शब्दानुसार प्रोडक्ट तयार करेल. यामध्ये थोडा विलंब नक्की झालाय ज्यामुळे आम्हाला फटका बसलाय. आम्ही हे नवीन पोर्टल फार अपेक्षेने आणलं आहे. यामध्ये थोडा गोंधळ आहे आणि आम्ही एकत्र काम करुन हा गोंधळ दूर करण्याचा प्रयत्न करत आहोत. मला विश्वास आहे इन्फोसिस हा गोंधळ लवकरच सोडवेल,” असंही निर्मला यांनी म्हटलं आहे.

लेखात काय होतं?

‘इन्फोसिस’ कंपनीच्या माध्यमातून एखादी देशविरोधी शक्ती देशाच्या आर्थिक हिताविरोधात तर काम करीत नाही ना, अशी शंका राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समर्थक ‘पांचजन्य’ या साप्ताहिकामध्ये व्यक्त करण्यात आली होती. ‘इन्फोसिस’ने अनेकदा नक्षलवादी, डावे यांना मदत केल्याचे आरोप आहेत, मात्र त्याचे पुरावे आमच्याकडे नाहीत, असेही ‘पांचजन्य’मधील लेखात म्हटलं होतं. वस्तू व सेवाकर (जीएसटी) आणि प्राप्ती कर पोर्टलमध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणींच्या अनुषंगाने ही टीका करण्यात आली आहे. ही दोन्ही पोर्टल इन्फोसिस या अव्वल भारतीय तंत्रज्ञान कंपनीने तयार केली आहेत. देशाच्या अर्थव्यवस्थेला मुद्दामहून अस्थिर करण्याचा हा प्रयत्न असू शकतो, असा आरोप पांचजन्यच्या ताज्या अंकात करण्यात आलेला. ‘साख और आघात’ या मुखपृष्ठ लेखात ही टीका करण्यात आली असून मुखपृष्ठावर इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे छायाचित्रही प्रसिद्ध केले आहे. उँची उडान, फिका पकवान, अशी टीकाही या लेखात करण्यात आली आहे.

तुकडे-तुकडे टोळी यांना मदत केली

‘इन्फोसिस’ने तयार केलेल्या या दोन पोर्टलमध्ये नेहमी तांत्रिक अडचणी येतात. त्यामुळे करदाते व गुंतवणूकदार यांची गैरसोय होते, असे नमूद करून या लेखात म्हटले आहे, की अशा बाबींमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरचा करदात्यांचा विश्वास कमी होतो. सरकारी संस्था महत्त्वाची संकेतस्थळे आणि पोर्टलची कंत्राटे इन्फोसिसला देताना मागेपुढे पाहत नाहीत, कारण ती एक नामवंत सॉफ्टवेअर कंपनी आहे. जीएसटी आणि प्राप्तिकर विवरण पत्रे यांची पोर्टल्स इन्फोसिसने विकसित केली आहेत. करदात्यांचा भारतीय अर्थव्यवस्थेवरचा विश्वास कमी होण्यास यामुळे मदतच होत आहे. भारतीय आर्थिक हिताविरोधात इन्फोसिसच्या माध्यमातून कुणी देशविरोधी शक्ती तर काम करीत नाहीत ना अशी शंका लेखात व्यक्त केली आहे. इन्फोसिसने अनेकदा नक्षलवादी, डावे, तुकडे-तुकडे टोळी यांना मदत केली असल्याचे आरोप आहेत, पण त्याचे पुरावे आमच्याकडे नाहीत. इन्फोसिस ही कंपनी परदेशी ग्राहकांना अशीच वाईट सेवा देते का, असा सवालही लेखात करण्यात आला होता.

आरोप प्रत्यारोप

पांचजन्यचे संपादक हितेश शंकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले, की इन्फोसिस ही मोठी संस्था आहे. सरकारने विश्वासार्हतेच्या आधारावर त्या कंपनीला महत्त्वाची कामे दिली आहेत. दरम्यान, हा लेखच देशविरोधी असल्याची टीका काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी ‘ट्विट’द्वारे केली होती. ‘इन्फोसिस’वर बदनामीकारक टीका करण्यात आली असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या या साप्ताहिकाने केलेले लिखाण उद्वेकजनक आणि देशविरोधी आहे. इन्फोसिससारख्या कंपन्यांनीच जगात भारताला स्थान मिळवून दिले आहे, असेही रमेश यांनी म्हटले होतं.

लेखाबाबत संघाने हात झटकले

मात्र लेखावरुन प्रंचड वाद झाल्यानंतर या लेखाचा संघाशी संबंध जोडू नये, असे संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख सुनील आंबेकर यांनी स्पष्ट केले होते. काँग्रेसने मात्र या लेखावरून संघाला लक्ष्य केल्याचं पहायला मिळालं. एक भारतीय कंपनी म्हणून ‘इन्फोसिस’चे देशाच्या प्रगतीत महत्त्वपूर्ण योगदान आहे. ‘इन्फोसिस’ने तयार केलेल्या वेब पोर्टलशी संबंधित काही मुद्दे असू शकतात, मात्र ‘पांचजन्य’ मध्ये या संदर्भात जो लेख प्रकाशित झाला आहे, ती त्या लेखकाची व्यक्तिगत मते आहेत, असे आंबेकर यांनी स्पष्ट केले आहे. तसेच ‘पांचजन्य’ हे संघाचे मुखपत्र नाही असे त्यांनी म्हटले आहे. प्राप्तिकर किंवा जीएसटी पोर्टलमध्ये काही अडचणी असू शकतात, मात्र त्याबाबत चर्चा करण्यासाठी संघ हे व्यासपीठ नाही, असे संघाच्या एका पदाधिकाऱ्याने नमूद केले. या पूर्वीही संघाने ‘पांचजन्य’ हे आपले मुखपत्र नाही असे स्पष्ट केले होते.

काँग्रेसकडून कारवाईची मागणी

देशाचा विकास आणि प्रगतीमध्ये मोठे योगदान असलेल्या इन्फोसिस कंपनीविरोधात पुराव्याअभावी बेफाम आरोप करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘पांचजन्य’ या मुखपत्राविरोधात कारवाई करण्याची मागणी काँग्रेसने केली होती. ‘इन्फोसिस’चे नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांचे देशासाठी मोठे योगदान आहे, असे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटलं होतं.